मुंबई – देशात करोना संसर्गाचे आगमण आणि त्यामुळे झालेले मृत्यू यावरून आता राजकारण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं सर्वोच्च सभाग्रह असलेल्या संसदेतून करोना फैलावासाठी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान सभागृहात खोटं बोलले, हे सुद्धा काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते सभागृहात बोलू शकले नाहीत, अशी टीका करत पंतप्रधान मोदींनी देशात करोना आणला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
केंद्र सरकारकडून विरोधकांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. 2024 मध्ये भाजपची सत्ता आली तर ते संविधान बदलू शकतात, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मतदान कऱण्याचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सपाला समर्थन देत आहोत. मी सर्व आंबेडकरवादी जनतेला देखील सांगत आहे, की उत्तर प्रदेशमध्ये सपाला मदत करा. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो. त्यामुळे आम्ही सपाला मदत करायचा निर्णय घेतल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे.