बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे (वय 28) या शेतकऱ्याच्या मुलाची दखल जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने घेतली आहे. राजू केंद्रे हे महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणसाठी कार्यरत असलेल्या ‘एकलव्य फाउंडेशन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘फोर्ब्स इंडिया’च्या सामाजिक क्षेत्रातील उद्यमशीलता या विभागामध्ये ‘प्रभावी तरूण व्यक्तिमत्वांच्या’ यादीत राजू यांची निवड झाली आहे.
राजू सध्या ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशीपवर लंडनमध्ये उच्चशिक्षण घेत आहे. भटक्या समाजातील आणि शेतकरी पुत्राला अशा यादीत कदाचित पहिल्यांदाच हा मान मिळत असल्याची भावना त्यांच्या गावामध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या गावामध्ये या निवडीमुळे राजूच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेत.
राजू केंद्रे यांची माहिती आणि कार्य –
राजू यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोटयाश्या खेड्यात भटक्या समाजातील कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांचं प्राथमिक शिक्षणही पूर्ण नाही. राजू यांच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे, असे त्यांचे पालक सांगतात. राजू यांचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न होतं. यासाठी पदवीच्या शिक्षणासाठी ते पुण्याला आले. मात्र खुप अडचणी आल्या आणि अवघ्या काही महिन्यात त्यांना पुणे सोडावं लागलं.
गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘एकलव्य’ नाव घेऊन एक प्लॅटफॉर्म तयार केला. विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण मार्गातील अडचणी कमी व्हायला हव्यात आणि जागतिक कीर्तीच शिक्षण मुलं कशी घेऊन शकतील याच दिशेने राजू यांनी काम करण्यास सुरुवात केली.
राजू यांनी टाटा इन्सिट्यूटमधून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. यादरम्यान त्यांनी २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली मात्र त्यांना अपयश आले. राजू यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास फेलोशिपमध्येही काम केलेले आहे, त्या काळात त्यांनी पारधी समाजासाठी विकासकामे केली. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. ज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने आणि ग्रामीण भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, मुंबई येथून ३० हजारांहून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागात ग्रंथालय उभी राहण्यासाठी वितरीत केली.
“आम्हाला राजूच्या कार्याचा फार अभिमान वाटतो. त्याच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता येतंय. गरीबांच्या मुलांनी शिकून राजूप्रमाणे जगभरात नाव कमावावं असं आम्हाला वाटतं.”, अशी भावना राजूचे आई-वडील आत्माराम केंद्रे आणि जिजाबाई केंद्रे यांनी व्यक्त केली आहे.