रांची – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दररोज अडिच लाखाहून अधिक करोनाबाधितांची भर पडत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन हाच पर्याय दिसत असल्याने अनेक राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र, दिल्लीनंतर आता झारखंडमध्येही 22 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत सात दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सोरेन यांनी 22 एप्रिल सकाळी 6 पासून ते 29 एप्रिल सकाळी 6 वाजेपर्यंत ‘आरोग्य सुरक्षा सप्ताह’ची घोषणा केली आहे. म्हणजेच यादरम्यान लाॅकडाऊनसारखेच नियम असणार आहेत. त्यांनी म्हटले की, या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे, करोनाची साखळी तोडण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील जनतेना संबोधित करताना सोरेन म्हणाले, झारखंडमध्ये वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे महत्वाचे आहे. झारखंड एक गरीब राज्य आहे आणि सुरवातीपासूनच नागरिकांचे प्राण वाचवण्यास प्राधान्य दिले गेले आहे. हे लक्षात घेऊनच लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 ते 29 एप्रिल हे सात दिवस ‘आरोग्य सुरक्षा सप्ताह’ साजरा करण्यात येईल. यामुळे करोनाची साखळी तोडून त्यावर नियंत्रण मिळवण्यात येईल.
लाॅकडाऊन काळात काय सुरु आणि काय बंद ?
1) जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवली जातील.
2) भारत सरकार, राज्य सरकार आणि काही खाजगी कार्यालये वगळता सर्व कार्यालये बंद.
3) कृषी, औद्योगिक, बांधकाम आणि खाणकाम संबंधीत कामे सुरु राहतील.
4) धार्मिक स्थळे खुली राहतील परंतु भाविकांची उपस्थिती प्रतिबंधित असेल.
5) पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई असेल.