शिलाँग – मेघालयातील काँगथाँग गावात सगळेच शिट्टीच्या सुरात एकमेकांना बोलवतात. गावची लोकसंख्या 700 असून ही आगळीवेगळी परंपरा वाचवण्यासाठी युनेस्कोने सहकार्य करावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. मेघालयाची राजधानी शिलाँगपासून 65 किलोमीटर अंतरावर काँगथाँग हे गाव आहे.
या गावातील लोकांची अशी श्रद्धा आहे की, रात्रीच्या वेळी दुष्ट शक्ती येतात आणि त्या शक्ती ज्यांना नावाने ओळखतात त्यांना इजा करतात, दुखापत करतात किंवा ती व्यक्ती आजारी पडतात किंवा मरण पावते. त्यामुळे रात्री कुणी घराबाहेर पडला तर त्याला नावाने हाक न मारता. गुप्त भाषेद्वारे संभाषण करून परस्परांचे दुष्ट शक्तींपासून संरक्षण केले जाते. रात्रीच्या वेळी दुसऱ्याला नावाने हाक मारण्याऐवजी शीळ घालून त्याचे लक्ष वेधले जाते. या शीळ घालून बोलवण्याच्या पद्धतीला जिंगवाई आयबेई म्हणून ओळखले जाते.
मूल जन्मले की, त्याचे नाव ठेवतानाच त्याच्यासाठी शीळेचा एक सूर तयार केला जातो. तो सूर त्याला बोलवण्यासाठी वापरला जातो, असे काँगथाँगमधील समुदायाचे 36 वर्षीय प्रमुख रॉथेल खोंगसित सांगतात. बाळाची आई गर्भवती असतानाच मुलाच्या नावाची शीळ संगीतबद्ध करते आणि प्रसूतीनंतर ती शीळ समुदायातील ज्येष्ठापर्यंत पोचवली जाते. मुले मोठी होतात तशी शीळ त्यांची ओळख बनते. जेव्हा व्यक्ती मरण पावते तेव्हा त्याच्याबरोबर त्याची शीळ नष्ट होते.
शीळबद्ध नावे ही या गावाची ओळखपद्धत बनली आहे. तिचे जतन व्हावे म्हणून युनेस्कोच्या मानवी अनमोल सांस्कृतिक ठेवा जतन यादीत या ओळखपद्धतीचा समावेश व्हावा अशी गावातील लोकांची इच्छा आहे. स्पेनमधील कॅनरी बेटांच्या समूहातील ला गोमेरा येथील लोक सिल्बो गोमेरो या शीळेच्या भाषेत संदेशाची देवाणघेवाण करतात. द न्यूयॉर्क टाईम्सने त्यांच्यावर माहितीपट बनवलेला आहे. ही शीळेची भाषा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.
त्याआधी 2017 मध्ये तुर्कस्तानातील पक्षांच्या भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात मेघालायातील दक्षिण शिलाँगचे आमदार सन्बोर शुल्लाई यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून शीळेने व्य्कतीची ओळख निश्चित करण्याच्या पद्धतीचा युनेस्कोच्या वारसा जतन यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारला स्मरणपत्र लिहिले आहे. कारण या पद्धतीचा अवलंब करणारे फक्त 700 गावकरी आहेत. सिल्बो गोमेरोचा वापर करणारे 22,000 तर टर्कीश बर्ड लँग्वेजचा
वापर करणारे 10,000 लोक आहेत. त्याउलट जिंगवाई आयबेई ही शीळपद्धती शाळेत शिकवली जात नाही किंवा तिचे वर्ग चालत नाहीत. त्यामुळे हा वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.