मुंबई- दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढीच्या आकड्यात घट झाली आहे. काही दिवसांपुर्वी हा आकडा रोज नवी उच्चांक गाठत होता. त्यामुळे गेल्या काही दिवसात कोरोनाबाबत चिंतेचं वातावरण राज्यभर निर्माण झाले होते. मात्र मागील दोन दिवसातील आकडेवारी पाहुन राज्याला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कोरोना आपलं रुप बदलत आहे, त्यामुळे संसर्ग वाढू शकतो. जगात दुसरीच नाही तर कोरोनाची तिसरीही लाट येण्याची शक्यता तज्ञांनी दर्शवली होती. मात्र रुग्णवाढीत सलग दुसऱ्यादिवशी झालेली घट पाहून ही शक्यता खोटी ठरु शकते.
काहीही असलं तरी देखील राज्यभरात ऑक्टोबर महिन्यापासून अनलाॅक पाचला सुरुवात होणार आहे. त्यादरम्यान अनेक बाबतीत शिथीलता येईल. मात्र सगळ्यांना स्वत;ची काळजी घेण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.