– महादेव जाधव
कोंढवा – लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्व व्यवहार मागील तीन महिने ठप्प झाले होते. यातून रोजगार बुडाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. यातून कोणतेही क्षेत्र अथवा समाजातील कोणताही घटक सुटला नाही. करोनाच्या भीतीने स्वत:ला घरात बंद करून घेतले तरी पोटाची आग विझविण्यासाठी पाणी नाही तर भाकरीच लागते. या भाकरीसाठीच अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू करून जगण्याचा नवा मंत्र शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बांधकाम व्यवसायासह अनेक ठिकाणचे कंत्राटी कामगार, मोलमजुरी करणारे तसेच रोज फिरून मालाची विक्री करणाऱ्यांच्या हातचे काम गेले. करोना नियंत्रणाविषयी असणारी अनिश्चितता पाहता परप्रांतीयांसह ग्रामीण भागातील अनेकांनी आपले गाव गाठले. चरितार्थाचा प्रश्न गंभीर झाल्याने हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा हाताला नवे काम शोधले.
रोजंदार स्वच्छतेच्या कामावर…
कंत्राटी कामगार, मजुरांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असताना अशा मजुरांनी आता स्वत:च सुरक्षिततेच्या साधनांसह स्वच्छेतेची कामे घेण्यास सुरुवात केली आहे. काही सोसायट्या, कॉलनीमध्ये जाऊन रस्ते, सांडपाणी स्वच्छ करून देण्याबरोबरच झाडू मारणे, कचरा गोळा करणे अशी कामे मजूर घेऊ लागले आहेत. लॉकडाऊनचा काळ असल्याने अगदी नगण्या मोबदल्यात अशी कामे करीत असल्याचे काही मजुरांनी सांगितले.
भाजीपाला विक्रीतून चार पैसे…
टेम्पोतून माल वाहतूक करणाऱ्यांचीही मोठी अडचण झाली. यातून टेम्पोचा हप्ता आणि महिन्याचा खर्च भागावा यासाठी जवळच्या गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तेथून ताजा भाजीपाला आणून शहरात ठिकठिकाणी भाजीपाला विक्री टेम्पोवाल्यांनी केली. यातून कुटुंबासाठीचा रोजचा खर्च सुटत असला तरी टेम्पोचे हप्ते आजही थकले आहेत. भाजी विक्रीतून फारसे काही हातात पडत नसले तरी चार पैसे स्वत: घरात आणत असल्याचे समाधान असल्याचे टेम्पो चालकांनी सांगितले.
किरकोळ कमाई मोठे समाधान…
लॉकडाऊन झाल्यामुळे 10 ठिकाणचे घरकाम बंद झाले. समाजसेवी संघटना काही आणून देत होते. मात्र, ही मदत तुटपुंजी आणि किती दिवस दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, त्यामुळे काहींनी घरामध्ये असलेल्या पुंजीमध्ये छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. दुकानात मिरच्या, गहू, तांदूळ निवडून देण्याची कामे अनेक महिलांनी सुरू केली आहेत. हॉटेल बंद असली तरी पार्सल सेवा सुरू असल्याने हॉटेलांना भाकरी, चपाती तयार करून देण्याचे कामही महिला करीत आहेत. यातून कमाई फारशी होत नसली तरी आपला चरितार्थ भागविण्यासाठी नवा मार्ग निवडल्याचे मोठे समाधान वाटत असल्याचे कष्टकरी महिला सांगतात.