ब्रिसबेन – संपूर्ण जग सध्या कोरोना महासाथीचा सामना करत आहे. जगभरामध्ये आतापर्यंत ३.७१ कोटी लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून १० लाखांहून अधिक लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. भारताला देखील कोरोना महासाथीचा चांगलाच फटका बसलाय. देशात आतापर्यंत ७० लाखांहून अधिक बाधित सापडले आहेत. अशातच आता कोरोना विषाणूबाबत झालेल्या एका संशोधनातून महत्वपूर्ण माहिती हाती लागली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सीएसआयआरओच्या डिसीज प्रीपेर्डनेस सेंटच्या संशोधकांनी कोरोना विषाणूवर केलेल्या संशोधनातून तो विविध पृष्ठभागांवर, विशिष्ट परिस्थितीमध्ये किती वेळेपर्यंत जिवंत राहू शकतो याबाबतचे महत्वपूर्ण निष्कर्ष हाती लागले आहेत.
कोरोना विषाणू (SARS-CoV-2) २० डिग्री सेल्सियस तापमानात काच (मोबाईल स्क्रीन), स्टील, आणि प्लॅस्टिकच्या नोटांवर झपाट्याने पसरतो. तो या पृष्ठभागांवर २८ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकत असल्याचंही आढळलं आहे. ३० डिग्री सेल्सियस तापमानात त्याची याच पृष्ठभागांवर जिवंत राहण्याची क्षमता ७ दिवस तर ४० डिग्री तापमानात २४ तासांपर्यंत घटते. असं संशोधनातून समोर आलं आहे.
कमी तापमानात खडबडीत पृष्ठभागांवर कोरोना विषाणूच्या जिवंत राहण्याची क्षमता घटते. कपड्यासारख्या खडबडीत पृष्ठभागांवर कोरोना १४ दिवसांनंतर जिवंत राहू शकत नाही असंही संशोधकांनी म्हंटलं आहे.