हैद्राबाद – मागील दीड वर्षांहून अधिक काळातपासून जगभरात करोनाने थैमान घातलं आहे. करोना संसर्गामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोना संसर्गातून ठणठणीत झालेल्यांची संख्या मोठी असून मृत्यूचं प्रमाण कमी आहे. मात्र अनेकांच्या मनात करोनाची दहशत आहे. याच दहशतीतून आंध्रप्रदेशातील संपूर्ण कुटुंबाने आत्महत्य केली आहे.
कर्नुल शहरातील वड्डेनगरी भागातील चार जणांच्या कुटुंबाने विष प्राशन करत आत्महत्या केली. या कुटुंबाची ओळख पटली असून प्रताप ( 42), हेमलता (36), जयंत (17) आणि रिशिता (14) अशी त्यांची नावं आहेत. यामध्ये प्रताप हा टीव्ही मेकॅनिक होता. जयंत एक कोर्स करत होता. तर रिशिता सातवीमध्ये शिकत होती.
पोलिसांना घटनास्थळावरुन सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण करोनाची भीती असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मित्राचा आणि नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनाही करोनाची भीती सतावत होती. या भीतीमधूनच या संपूर्ण कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले.
सकाळी उशिरापर्यंत प्रताप यांच्या घरातून कोणीही बाहेर आलं नाही, म्हणून शेजाऱ्यांना संशय आला. त्यामुळे पोलिसांना बोलविण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह आढळून आले.