नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचा वेग हळूहळू कमी होत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १३ हजार ३८७ वर पोहचला आहे. तर कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून मृतांचा आकडा ४३७ झाला आहे. सध्या ११ हजार २०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर १ हजार ७४९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १९४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार ६९९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील ३ हजार २०५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत तर ३०० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.