औरंगाबाद- करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत. 12 आणि 10 चे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश येथील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत. नव्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.
रूग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशानने प्रतिबंधात्मक उपायांची अंमबलबजावणी सुरु केली आहे. ज्या व्यक्तीला करोनचा संसर्ग झालेला असेल, त्या रुग्णाचे घर सील करण्यात येणार आहे. घर सील करून घरावर स्टिकरही लावण्यात येणार आहे. येथील प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गती दिलेली आहे.
नाशिकमध्येही लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध
नाशिक प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकतील. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.