मुंबई/भोपाळ – करोनाची तिसरी लाट ओसरल्याने पुन्हा देश निर्बंधमुक्त होतो आहे. अलीकडेच गोव्यातील लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तर आता मध्य प्रदेशही पूर्ण निर्बंधमुक्त झाले आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग एवढेच नियम लागू असणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातही लवकरच निर्बंध हटवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या काही दिवसात टास्क फोर्सशी बैठक घेऊन पुढील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल असे महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यालाही दिलासा मिळाण्याची शक्यता आहे. मात्र मास्क काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांनीही अगोदरच स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रही लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करेल, असा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण होईल, तेवढ्या लवकर परिस्थिती अधिक सुधारत जाणार आहे. त्यामुळे निर्बंधातून मुक्तता हवी असेल तर महाराष्ट्रानेही लसीकरणावर भर देण्याची गरज आहे.