नवी दिल्ली – युक्रेन आणि रशियाच्या सीमेवर निर्माण झालेला तणाव हा चिंतेचा विषय आहे. या तणावात या विभागातील शांतता आणि सुरक्षा उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे, अशी भूमिका भारताने मंगळवारी मांडली. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली.
भारताने या विभागातील तणाव तातडीने कमी करण्याची गरज व्यक्त करताना सहा प्रमुख मुद्दे मांडले. ते पुढीलप्रमाणे
1) विलगतावाद्यांच्या ताब्यातील दोन प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याच्या रशियाच्या घोषणेचा भारत निषेध करत नाही. भारत या चित्राकडे स्वाभाविक म्हणून पाहते, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दृष्टीकोनातून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राष्ट्रे त्याकडे पहात नाहीत.
2) भारताने आपल्या निवेदनात रशियाच्या कारवायांचा कोणताही उल्लेख केला नाही. युक्रेन आणि रशियाच्या सीमेवर निर्माण झालेला तणाव चिंता निर्माण करणारा आहे. या तणावात या विभागातील शांतता आणि सुरक्षा नष्ट करण्याची क्षमता आहे, असे संयुक्त राष्ट्रेतील कायमस्वरूपी सदस्य टी. एस. तिरूमुर्ती यांनी या बैठकीत सांगितले.
3) युक्रेनमध्ये 20 हजार पेक्षा अधिक भारतीय नागरिक राहतात. त्यात मुख्यत: विद्यार्थ्यांचा समावेश अहे. यातील अनेक जण सीमावर्ती भागात राहतात.त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न भारतासाठी महत्त्वाचा आहे. त्यांचे हित पाहणे भारतासाठी प्राधान्याचे आहे.
4) हा तणाव कमी करण्यासाठी काही पक्षांना त्यांचा भाग घेण्याचे प्रयत्न करावेत. या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. या तिहेरी बैठकीतून तोडगा काढण्याचे प्रयत्न करायला हरकत नाही.
5) सर्व बाजूंनी संयम पाळण्यावर आम्ही भर देत आहोत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम राहण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गती वाढवावी. त्यातून उभय पक्षी मान्य होईल, असा तोडगा लवकरात लवकर काढावा.
6) भारताने भौगोलिक एकात्मता आणि सार्वभौमत्व या दोन शब्दांचा वापरही केला नाही.
भारताच्या लष्करी साधन सामुग्रीमध्ये 60 ते 70 टक्के सामुग्रीचे मुळ रशियन बनावटीचे आहे. त्याकडे चीन सीमेवर असणाऱ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर दुर्लक्ष करता येणार नाही. हेच भारताच्या भूमिकेमागचे प्रमूख कारण होते.