सौम्य किंवा लक्षणे नसलेल्यांसाठी शासनाचा निर्णय
पुणे – सौम्य, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या करोनाबाधित व्यक्तीला सातव्या दिवसापासून सलग तीन दिवस कोणत्याही औषधाची आवश्यकता नाही. तसेच ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्क्यांहून अधिक आहे, अशा व्यक्तीला दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, पुढील सात दिवस त्या व्यक्तीने घरातच स्वतःला विलग करून घ्यायचे आहे. प्रशासनाने तसा शिक्का संबंधित व्यक्तीच्या हातावर मारावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात करोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील क्षमता हळूहळू कमी होत आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून अतिरीक्त सुविधा तयार करत आहे.
दरम्यान, या आधी करोनाबाधित व्यक्तीला 14 दिवस रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले जात होते. 14 व्या आणि 15 व्या दिवशी बाधित व्यक्तीची दोनवेळा नमुने घेऊन तपासणी केली जात होती. दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यावर त्याला घरी सोडण्यात येत असे. मात्र, आता ही प्रक्रिया टाळण्यात येणार आहे.
सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, सौम्य, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या करोनाबाधित व्यक्तीला आता दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला सलग तीन दिवस कोणत्याही औषधाची आवश्यकता भासू नये. मात्र, त्या व्यक्तीला पुढील 7 दिवस घरीच विलगीकरणाच्या सूचना देऊनच घरी सोडले जाते.
असा झाला निर्णय…
– सौम्य, अति सौम्य किंवा लक्षणे असलेल्यांना आरोग्य संस्थांमध्ये दाखल करण्यात आल्यास त्यांची दररोज दोन वेळा शरीराच्या तापमानाची तपासणी करावी.
– रुग्णाला लक्षणे सुरू झाल्यापासून सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी ताप नसल्यास दहाव्या दिवशी तपासणी करून डिस्चार्ज द्यावा. त्यासाठी पुन्हा करोना विषाणूसाठी प्रयोगशाळा तपासणीची आवश्यकता नाही.
– या रुग्णांना पुढील सात दिवसांसाठी घरीच विलगीकरण सूचना देऊन हातावर सात दिवसांचा होम क्वारंटाइन शिक्का मारावा.
– या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा कमी आढळून आल्यास रुग्णांना डेडिकेटेड सेंटरला संदर्भित करण्यात यावे
– रुग्णांना पुन्हा करोनाची लक्षणे आढळल्यास जवळचे केअर सेंटर अथवा राज्याच्या 104 टोल फ्री क्रमांक हेल्पलाइनवर अथवा नियंत्रण कक्ष 020-26127394 येथे संपर्क करावा.