जेजुरी -पुरंदर तालुक्यामधील तीर्थक्षेत्र जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या भक्तनिवासातील डायलिसिस सेंटरमधील 25 वर्षीय लॅब टेक्निशियनचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीने एका डायलिसिस रुग्णासह स्वतःची चाचणी बुधवारी (दि. 6) एका खासगी लॅबमध्ये केली होती. मात्र, शुक्रवारी (दि. 8) रात्री डायलिसिस करणाऱ्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला तर कर्मचाऱ्याचा अहवाल पिझिटिव्ह आला आहे. महसूल, पोलीस, नगरपालिका, आरोग्य प्रशासनाला याची माहिती मिळताच सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
जेजुरी शहरात शनिवारी (दि. 9) सकाळच्या सुमारास ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. सर्व रस्ते सुनसान झाले प्रशासनाकडून भक्तनिवास सील करण्याच्या सूचना प्राप्त होताच सर्व उपक्रम बंद करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली. परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, तहसीलदार रुपाली सरनोबत, जेजुरी नगरपालिका मुख्याधिकारी पूनम शिंदे-कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर,अधिकारी, कर्मचारी यांनी जेजुरी शहरात दाखल होत पुढील उपाययोजना व कार्यवाहीस सुरुवात केली
. बाधित तरुणाला पुणे येथे उपचारासाठी व चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. हा तरुण ज्या भागात राहतो. तेथील 12 नागरिक व तरुणाच्या संपर्कात आलेल्या डायलिसिस सेंटर व देवसंस्थानच्या 11 कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचा भाग म्हणून शहरातील एका लॉजमध्ये होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्याही तपासण्या ग्रामीण रुग्णालयाकडून करण्यात येत आहेत. विविध भागातून व दुसऱ्या तालुका व जिल्ह्यातून जे रुग्ण मागील 15 दिवसांत डायलिसिस सेंटरमध्ये येऊन गेले आहेत. त्यांचीही माहिती संकलीत करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
देवसंस्थानतर्फे सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी- जगताप
गेल्या 24 मार्चपासून देवसंस्थानचे कर्मचारी अधिकारी, विश्वस्त करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील परप्रांतीय कामगार, बेरोजगार,बेघर, नागरिक आदी सुमारे 3200 जणांना अन्नसेवा पुरवत आहेत. जंतुनाशक औषध फवारणी, जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट वाटप, शहर व परिसरात जनजागृती, पोलीस प्रशासनाला रस्ते बंदोबस्तासाठी मदत आदी उपक्रमात कर्मचारी कष्ट घेत आहेत.
मात्र, आता त्यातील काहीजणांना होम क्वारंटाइन व्हावे लागल्याने प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. अन्नसेवा व आपत्कालीन वेळेत लोकसेवेच्या उपक्रमाला खीळ बसली आहे. देवसंस्थानच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासण्या व चाचण्या करण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात गरजू, बेरोजगार, बेघर, परप्रांतीयांची गावाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संशयाच्या नजरेने पाहू नये, असे आवाहन करत या धोक्यातून सर्व बाहेर येतील आणि स्थिती पूर्ववत होईल, असा विश्वास मुख्य विश्वस्त संदीप जगताप यांनी व्यक्त केला.