बाजारभाव गडगडले ; किलोमागे 40 ते 50 रुपयांचा तोटा
मंचर -करोना व्हायरसचा फटका आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असून, बाजारभाव गडगडले आहेत. 140 ते 150 रुपये किलो दराने निर्यात होणारी द्राक्षे सद्यःस्थितीत 100 रुपये बाजारभावाने विकली जात आहेत. किलोमागे 40 ते 50 रुपयांचा तोटा द्राक्ष उत्पादकांना सहन करावा लागत आहे. सरकारने द्राक्ष उत्पादकांना अनुदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला द्राक्षाला 180 ते 200 रुपये किलो दरम्यान परदेशात बाजारभाव होता. त्यानंतर थोडे फार बाजारभाव कमी होऊन द्राक्षाला 140 ते 150 रुपये किलो बाजारभाव मिळत होता; परंतु द्राक्षावर करोनाचे संकट पडल्यामुळे एक्सपोर्ट कॉलिटीच्या द्राक्षांना 100 रुपये किलोप्रमाणे बाजारभाव सद्यःस्थितीत मिळत आहे.
द्राक्षाचे एकरी आठ ते दहा टन उत्पन्न निघते; परंतु मध्यंतरी अतिवृष्टी आणि गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होऊन एकरी सहा टन उत्पन्न मिळत आहे. एक एकराला वर्षभरात मजुरी, खते, औषधे यांच्यासह एकूण चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो; परंतु बाजारभाव घसरल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. करोना व्हायरसमुळे बाजारभाव घसरले आहेत. त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसल्याने सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, दिलीप वऱ्हाडी यांनी केली आहे.
जम्बो द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी
द्राक्षाचे माहेरघर असलेल्या कळंब (ता. आंबेगाव) येथील द्राक्ष हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असून कळंब जम्बो द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. कळंब येथील जम्बो जातीची द्राक्षे श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश, थायलंड, दुबई अशा विविध ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातात. कळंब परिसरात सुुमारे अडीचशे एकर द्राक्ष बागायत क्षेत्र आहे. येथे कळंब जम्बो, नाना पर्पल, शरद अशा विविध प्रकारच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.
द्राक्षबाग चालू झाल्यानंतर द्राक्ष काढणीसाठी नाशिक परिसरातील तसेच कळंबच्या ठाकरवाडी परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र या रोजगारीवर देखील परिणाम झाला असून, स्थानिक बाजारात 70 ते 80 रुपये किलो दराने द्राक्षांची विक्री होत आहे.
– विष्णु कानडे, द्राक्ष बागायदार.