राजेगाव – सध्या जगभर करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता राज्यातील अनेक जिल्हे देखील करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ग्रामीण भागातील युवक नोकरीनिमित्त नेहमी मुंबई – पुणे या शहरांकडे वळतात. किंबहुना रोजगार आणि ग्रामीण भागातून जाऊन तिथेच आपला संसार थाटताना दिसतात. सध्या करोना या संसर्गजन्य रोगाची धास्ती बसल्याने प्रत्येकाची पावले आत्ता गावाकडे वळू लागली आहेत.
चीन या देशातून निर्मित झालेला हा जीवघेणा रोग अगदी दाराजवळ येऊन ठेपला आहे. पुण्यात रहिवासी असलेल्या जावई-लेकींनी शहराच्या गर्दीत नको..आता आपल्या गावाकडेच चला, असे म्हणत आपल्या ग्रामीण भागातील गावांचा रस्ता धरला आहे.
खेड्यातून पुणे या ठिकाणी कामानिमित्त रहिवाशी असलेली अनेक कुटुंबे सध्या गावाकडे येताना दिसत आहेत.
कर्जत तालुक्यातील भीमा पट्ट्याचा बागायती भाग सोडला तर अनेक गावे दुष्काळी म्हणूनच ओळखली जातात. मुबलक पाणी, रोजगार निर्मिती, दळण-वळण अशा अनेक अपुऱ्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील अनेक मुली शहरी भागात दिल्या जातात.
दुष्काळाचा सामना करत जे आपण भोगले आहे. त्या यातना आपल्या मुला-मुलींच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणून लग्नानंतरच्या आयुष्यात शहरी भागाला पसंती होती.
मात्र शहरी भागात दिवसेंदिवस होत असलेली गर्दी, वाढते प्रदूषण, अपघात आणि त्यातच करोना या संसर्गजन्य रोगाचे वाढते प्रमाण यामुळे खेड्यातले जीवनच आरोग्यदायी असल्याच्या मताला अनेकांकडून शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. याला आता करोनोमुळे बळ मिळाले आहे.
“फॉरेन रिटर्न’ची हवा करोनाने घालवली
नोकरीनिमित्त ग्रामीण भागातील अनेक तरुण परदेशात असतात. ग्रामीण भागातील सोहळ्यानिमित्त ते थाटात उपस्थित राहतात. त्यावेळी फॉरेन रिटर्न ही कुजबुज प्रतिष्ठेची वाटायची, आता मात्र परिस्थिती उलट आहे. फॉरेन रिटर्न म्हटलं की करोनाची लागण तर झाली नसेल ना? अशा संशयाच्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले जाते.