मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे पाच डॉक्टर कोरोनाचे संशयित असल्याचे मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे म्हणणे आहे. या डॉक्टरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.
हे संशयित कस्तूरबा रुग्णालय आणि विमानतळावर कार्यरत होते. सध्या रुग्णालयात मास्कचा तुटवडा आहे. एक मास्क डॉक्टरांना दोन ते तीन दिवस वापरावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरच कोरोनाच्या भीती खाली आहेत, असे मार्डचे म्हणणे आहे.
कोरोनाचे बाधित मुंबईत अधिक संख्येने आहेत. त्यातच डॉक्टरांना याची बाधा झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चीनमध्ये कोरोनावर उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. कोरोनाच्या साथीचे पहिल्यांदा भाकीत केलेल्या डॉक्टरला चीनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या डॉक्टरांच्या कुटुंबियांची चीन सरकारने अलीकडेच माफी मागितली होती.