मुंबई – करोना साथीच्या काळात झालेल्या मृत्यूची पडताळणी महाराष्ट्र सरकार करत असून त्यात गेल्या 12 दिवसांत करोना बळींची संख्या आठ हजार 800 ने वाढली आहे. त्यामुळे एकूण करोना मृतांची संख्या एक लाख आठ हजारांवर पोहोचली आहे. पुण्यातील मृतांची संख्या एक हजार 358 वाढली आहे.
पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आणि यवतमाळ करोना मृतांच्या नोंदणीत विलंब झाला होता. त्यामुळे करोना मृतांच्या संख्येची पडताळणी सरकारने सुरू केली होती. त्यात पहिल्या तीन ठिकाणी अनुक्रमे एक हजार 358, एक हजार 167 आणि पाचशे तीन रुग्णांची नोंद झाली, असे त्यात म्हटले आहे.
शुक्रवारी एक दिवसांत नवीन दोन हजार 213 जणांची नावे पडताळणीत समाविष्ट करण्यात आली. महराष्ट्र राज्य सरकार प्रत्येक आठवड्याला मृतांची संख्या जाहीर करत असते. मात्र सरकार मृतांची संख्या कमी दाखवत असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.
आता दररोज मध्यरात्री राज्याच्या पोर्टलवरील नोंदी आणि जिल्हास्तरावरून आलेल्या नोंदी पडताळण्यात येतात. त्यात दुबार नोंद झालेली नावे काढून टाकण्यात येतात. त्यानंतर ही यादी स्थानिक प्रशासनाकडे पाठवण्यात येते. तेथे त्याची पडताळणी झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता अंतीम अधिकृत यादी निश्चित करण्यात येते.
जिल्हा स्तरावरील रुग्णालये वेळेत ही यादी अद्ययावत करत नाहीत. एप्रिल आणि मे महिन्यात मनुष्य बळाचा तुटवडा आणि ऑक्सिजन आणि बेड व्यवस्थापनाकडे मुख्य प्रकाशझोत राहिला. त्यामुळेही हा विलंब झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.