मांडवगण फराटा -करोना अन् लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने शासनाने कडक निर्बंध घालून लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.
सतत कांदा पिकाला बाजारभाव नसल्याने उशिरा काढणी सुरू केली, मात्र अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसाच्या सरींनी शेतात साठवणूक केलेल्या कांद्याला मोठा फटका बसला.
काही डाळिंब बागा बहरात असल्याने आलेला फुलोरा वाऱ्याने गळून गेला. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कैऱ्या जोरदार वाऱ्याने पडून मोठे नुकसान झाले आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात शिरसगाव काटा येथील पोल्ट्रीमध्ये अचानक आलेल्या जोरदार वादळाने इंटरनेट टॉवर कोसळून चार दुचाकींचे तसेच इतर मिळून सुमारे दहा लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.