पुणे – पावसाळा अवघ्या काही दिवसांवरून आला आहे. तर, नाले सफाईच्या कामांवरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. नाल्यांच्या नावाखाली विरोधीपक्ष पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका करत जणू राजकीय आरोप-प्रत्यारोपांचीच “साफसफाई’ केली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी महापालिकेतील पावसाळी कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवली होती. हा प्रकार क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, उपायुक्त आणि ड्रेनेज तसेच पथ विभागांच्या कर्मचाऱ्यांसमोरच घडल्याने त्यांचेही मजोरंजन झाले.
पावसाळा तोंडावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाई, पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचे काम 50 टक्केदेखील पूर्ण झालेले नाही. ही कामे मेमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नालेसफाईला खूप उशीर झाला आहे, असा आरोप विरोधीपक्ष राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेने केला आहे.
तर, विरोधक बैठकीत काहीच बोलले नाहीत, पण बाहेर वेगळी भूमिका घेतात अशी टीका महापौरांनी केली आहे. या बैठकीत शहरातील पाच झोनच्या सहायक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या कामाचे सादरीकरण केले. त्यामध्ये शहरातील धोकादायक ठिकाणी कोणती, नाल्यांच्या स्वच्छतेची काय स्थिती आहे याची माहिती दिली. दरम्यान, शहरात गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक ठिकाणे आहेत. त्याच्यात घट का होत नाही, दरवेळी तेच आकडे का सादर केले जातात? असे प्रश्नही बैठकीत उपस्थित केले गेले.
ही स्क्रिप्टेड मीटिंग होती. जेव्हा अधिकाऱ्यांनी माहिती दिली, त्यात केलेले काम काहीच नव्हते. केवळ हे करणार, ते करणार असेच सांगण्यात येत होते. तर दरवर्षी केवळ पैसे पाण्यात घालवण्याचे काम केल जात आहे. गेल्या चार वर्षांत तेच भाग आहेत, की जिथे पाणी साचत आहेत. दरवर्षी ते कमी करण्यासाठी खर्च होतो. मात्र, पुन्हा तेच स्पॉट दाखवले जात आहेत. मग हा कामांचा पैसा कुठे गेला कुठे? याचे उत्तर सत्ताधारी आणि प्रशासनाकडेही नाही. तर आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे का? हेच माहिती नाही. त्यामुळे केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. त्यामुळे हाल मात्र पुणेकरांचे होत आहेत.
– पृथ्वीराज सुतार, गटनेता, शिवसेना
पावसाळापूर्व तयारीच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये कामाची गती वाढविण्यास सांगितले आहे. पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते दुरुस्तीचे आदेशही दिले आहेत. विरोधकांनी बैठकीबाहेर कामावर टीका केली असली, तरी बैठकीत ते काहीही बोलले नाहीत. केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. तसेच यात राजकारण करण्याची कोणतीही गरज नाही. उलट आपत्तीच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचीही मते जाणून घेतली असून, त्यांची अंमलबजावणी केली जाईल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर
शहरात मे अखेरीस पावसाळापूर्व कामे होणे अपेक्षित आहेत. मात्र, प्रशासन आताही निविदांमध्येच अडकले आहे. शहरात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून मे महिना संपण्यास अवघे काही दिवसच आहेत. मात्र, या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात पुणेकरांना आणखी संकटाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत हा त्रास होत असतानाही सत्ताधाऱ्यांना त्याबाबत काहीच पडलेले नाही. पुणेकरांची जीवित अथवा वित्तीय हानी झाल्यास त्याला सत्ताधारीच जबाबदार असतील.
– दीपाली धुमाळ, विरोधीपक्ष नेत्या