लक्षवेधी : हेमंत देसाई
भारतातल्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याची व नाक खुपसण्याची इम्रान खानसारख्या पाकिस्तानी नेत्यांना जुनीच खोड आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैनिकांनी संपूर्ण माघार घेतल्यानंतर तेथे तसेच पाकिस्तानमध्ये तालिबान्यांचा धुडगूस वाढणार आहे. भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे व्रत तर पाकिस्तान स्वतः नष्ट होईपर्यंत पाळणारच आहे. अशा कंगाल व दहशतवादी देशाचे नेतृत्व उद्योगपती व लष्कराची गुलामी करणाऱ्या इम्रान खान यांच्याकडे आहे.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकस्मिकरीत्या लॉकडाउन घोषित केल्यामुळे असंघटित कामगारांची अक्षरशः दैना झाली आहे. त्यापैकी बहुसंख्य स्थलांतरित मजुरांची मजुरीही गेली आहे आणि त्यांना आपल्या मूळ गावीही परतता येत नाही, अशी स्थिती आहे. ब्रिटनमध्ये खूप उशिराने अंशतः लॉकडाउन जाहीर करणाऱ्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना स्वतःलाच करोना झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ईस्टरपर्यंत लॉकडाउन संपुष्टात येईल. त्यामुळे लाख लोकांची आयुष्ये धोक्यात आली, तरी त्यांना त्याची पर्वा नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर संपूर्ण लॉकडाउनच्या संकल्पनेसच विरोध केला आहे. विशेष म्हणजे, लष्करी अधिकारी मेजर जनरल इफ्तिकार यांनी सर्वप्रथम लॉकडाउनची कल्पना मांडली. वास्तविक लॉकडाउन करायचे की नाही, याचा जो काही निर्णय घ्यायचा तो लोकशाहीनियुक्त सरकारने घ्यायला हवा, लष्कराने नव्हे.
2018 साली इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख देशाच्या आर्थिक धोरणातही हस्तक्षेप करू लागले. पाकिस्तानात इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा पक्ष सत्तेवर आहे. पाकमधील इतर पक्षांचे नेतृत्व बदलले गेले, तरी ते पक्ष संपणार नाहीत. परंतु उद्या लष्कराने इम्रान यांची हकालपट्टी केली, तर त्या पक्षाचा दुसरा नेता पंतप्रधान होऊ शकणार नाही. कारण इम्रान खान यांच्याविना तो पक्ष टिकेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार दुबळे असले आणि करोनासारख्या संकटाशी मुकाबला करण्यात ते असहाय ठरणार असले, तरी या सरकारची टर्म लष्कर पूर्ण करू देईल, अशीच शक्यता दिसते. परंतु त्याचवेळी पाकिस्तान मुस्लीम लीगकडे (नवाझ शरीफ यांचा पक्ष) एक पर्याय म्हणून बघितले जात आहे. कारण करोनामुळे पाकने सर्व आंतरराष्ट्रीय विमानांची सेवा रद्द करण्याच्या घोषणेपूर्वीच माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे कनिष्ठ बंधू शहबाज हे आदल्या रात्री लंडनहून पाकिस्तानात दाखल झाले. इम्रान खान यांना परिस्थिती योग्यपणे हाताळता येत नसून, त्यामुळे लष्कर शहबाज शरीफ यांना सत्तेवर बसवेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. कदाचित इम्रान खान यांना गचांडी देऊन देशात राष्ट्रीय सरकार स्थापनही केले जाऊ शकते. सिंधमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)ची सत्ता असून, तेथे करोनाबाबत तत्परतेने निर्णय घेतले जात आहेत. पीपीपीला लष्कराशी सहकार्य करण्याची इच्छा असून, त्या बदल्यात माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे चिरंजीव बिलावल भुत्तो यांना लष्कराकडून पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानी लष्करातील जवान आपले एक दिवसाचे वेतन करोनाग्रस्तांना देणार आहेत. परंतु अशा आपत्तीच्या वेळेस पाकिस्तानात लष्कर बोलवले जाते, तेव्हा जवानांना विशेष भत्ता दिला जातो. जवानांनी करोनाग्रस्तांना दिलेल्या रकमेपेक्षा हा भत्ता नक्कीच जास्त आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी पाक सरकारकडे पुरेसा निधी नाही. वास्तविक अशावेळी देशाचा बिगर विकासखर्च करोनाच्या विरोधात वापरण्याची गरज आहे. परंतु लष्कर हे होऊ देणार नाही आणि सर्व निर्णय घेण्याचे अधिकार लष्कराने स्वतःकडे घेतलेले आहेत.
इम्रान खान लॉकडाउनला विरोध करत आहे, याचे कारण उद्योगपतींचा त्यांच्यावर दबाव आहे. देशाचा परकीय चलनसाठा वाढण्याकरिता वस्रोद्योग निर्यातदारांना नैसर्गिक वायू सवलतीच्या दरात मिळाला पाहिजे. तसेच कारखान्यातून बंदरापर्यंत त्यांना वाहतूक करता आली पाहिजे, असा युक्तिवाद उद्योगपती करत आहेत. करोनामुळे लोक मेले, तरी त्यांना त्याची पर्वा नाही. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अर्थसाह्य घेण्याचा जो करार केला, त्याबाबतही अनेक अटी व शर्ती लागू होणार होत्या. त्यामुळे आपल्या व्यापार-उद्योगावर परिणाम होईल अशी ओरड उद्योगजगतातून केली जाऊ लागली.
सहा-सात महिने इम्रान खान सरकारने नाणेनिधीचा कार्यक्रम स्वीकारण्याबाबत टाळाटाळ केली. सौदी अरेबिया, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीकडून पाकिस्तानात निधी येत असून, तो पुरेसा आहे, नाणेनिधीची गरज नाही, असे प्रतिपादन केले जाऊ लागले. निर्णयप्रक्रिया लांबल्यामुळे पाकचे सहा अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. अखेर अर्थखात्याचे नेतृत्व बदलावे लागले आणि नंतरच नाणेनिधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मात्र पाकिस्तानमधील काही प्रांतांनी जनजीवनावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांना लष्कराचाही पाठिंबा मिळत आहे. उद्या देशव्यापी निर्बंध लागू करण्यास आपण उशीर केल्यास आणि करोनाचा संसर्ग वाढल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर येईल, याचा अंदाज इम्रान खान यांना येऊ लागला आहे, असे दिसते. लॉकडाउनमुळे गोरगरिबांच्या अडचणीत वाढ होते. परंतु हे लक्षात घेऊन, त्यांना सामाजिक संरक्षण पुरवणे, सार्वजनिक आरोग्य सोयींचा विस्तार करणे आणि करोना चाचण्यांची क्षमता वाढवणे, हे उपाय योजता येतात. आज जगभर करोनामुळे हाहाकार माजला आहे.
पाकिस्तानच्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. आपल्याकडे अनेक आधुनिक तांत्रिक सेवा-सुविधा आहेत. भारतात अनेक अत्याधुनिक सार्वजनिक व खासगी इस्पितळे आहेत. या सगळ्याची पाकची तुलनाही होऊ शकत नाही.