आतापर्यंत चीनमध्ये 425 जणांचा मृत्यू
वुहान : चीनमध्ये धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना विषाणूने एका दिवसामध्ये तब्बल 64 नागरिकांचा बळी घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा वाढून 425 झाला आहे. चीनच्या वुहानमधून पसरणाऱ्या या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये तब्बल 14 हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या सर्व नागरिकांवर उपचार करण्यासाठी चीनने केवळ 9 दिवसांमध्ये मोठ्या हॉस्पिटल उभे केले आहे.
China virus cases exceed 20,400 nationwide, government says: AFP news agency #Coronavirus https://t.co/mn6Cy1vrH7
— ANI (@ANI) February 4, 2020
भारतामध्ये सुध्दा कोरोना विषाणूचे तीन रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये एका आठवड्यामध्ये कोरोना विषाणूचे तीन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयातील स्वतंत्र कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. हे तिन्ही रुग्ण चीनवरुन केरळमध्ये आले आहेत. केरळमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढल्यानंतर राज्य सरकारने कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या संकटाची चाहूल असल्याचे जाहीर केले. केरळमधील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य आपत्तीची घोषणादेखील केली आहे.
चीन आणि हॉंगकॉंगनंतर आता मुंबई विमानतळावर सिंगापूर आणि थायलंडवरुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु आहे. प्रवाशांच्या तपासणीत मदत करण्यासाठी राज्य सरकारने भारतीय विमानतळ प्राधिकरणास 25 आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक उपलब्ध करून दिले आहे. तसेच, पश्चिम बंगाल सरकारने कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी दोन थर्मर स्कॅनर बसवले आहे.