मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा म्हटले आहे की, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचा आमचा निर्धार कायम आहे.
तसेच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. याच मुद्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच मुद्यावरून आता त्यांच्या या भूमिकेवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलतांना रामदास आठवले म्हणाले,’बाळासाहेबांची कॉपी राज ठाकरे हे कधीच करू शकत नाहीत. बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं.’ ते पुढे म्हणाले,’ मशिदीवरील भोंगे काढा अशी भूमिका कधी बाळासाहेबांनी घेतलेली नाहीच. आणि त्यांनी नेहमीच मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांचा फक्त दहशतवादी मुस्लिमांना नेहमीच विरोध होता. त्यामुळे बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोप्प काम नसून राज ठाकरे कधीच बाळासाहेबांना कॉपी करू शकत नाही. ” असं म्हणत आठवले यांनी राज ठाकरेंना सुनावले आहे.