सातारा – आजपर्यंत रामराजेंच्या नादाला जे लागले त्यांचे वाटोळेच झाले आहे. त्यांना काळाचा महिमा कधी समजलाच नाही. सिद्धनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीत आम्ही फलटणमध्ये लीड घेऊन त्यांना तोंडावर पाडले. त्याची त्यांना शरम नाही. मी अनेक संस्था वाचवल्या आहेत. मात्र, फलटणची मालोजीराजे बॅंक चालवायला देणाऱ्यांनी, श्रीराम साखर कारखाना, दूध संघासारख्या संस्थांची वाईट अवस्था करणाऱ्यांनी माझ्या नादाला लागू नये, असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला.
दहिवडी येथे सिध्दनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीत सभासद सेवक परिवर्तन पॅनलच्या विजयानंतर ते बोलत होते. यावेळी सर्व नूतन संचालक, सभासद, कर्मचारी आणि ठेवीदार उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, अनेक वेळा रामराजेंनी माझ्या विरोधात षडयंत्रे रचून आणि कारस्थाने करुन मला अडवायचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःचे थोबाड फोडून घेतले. मी कधी कुणाच्या वाटेला गेलो नाही. कुणाचे कधी नुकसान केले नाही. मात्र, रामराजेंनी आजपर्यंत कधी चांगला विचारच केला नाही. मी नेहमी सत्ताधाऱ्यांविरोधात लढत आलो. त्यांनी कधी तरी सत्तेची कवचकुंडले बाजूला ठेवून माझ्याशी लढाई करावी. ते पालापाचोळ्यासारखे उडून जातील.
त्यांनी सिध्दनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीत पॅनल उभे केले. रामराजे यांनी मालोजीराजे बॅंक चालवायला दिली, श्रीराम कारखाना, दूधसंघाची वाईट अवस्था केली. त्यांनी त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलेय त्याचा विचार करावा. जयकुमार बारामती, कराड, फलटणकरांना जयकुमार समजला नाही. त्यामुळे विरोधकांनी माझ्या नादाला लागू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सिध्दनाथ पतसंस्थेत अनेकांनी कष्टाचा पैसा ठेवला आहे. नूतन सर्व संचालक या संस्थेचे सिक्युरिटी गार्ड आहेत. मी फक्त वॉचमन म्हणून काम करणार आहे. संस्थेत कधीच राजकारण आणणार नाही. संस्था कायमच सभासदांची राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच ….
एक तर मी कुणाच्या वाटेला जात नाही. मात्र, माझ्या वाटेला जाणाऱ्यांना सोडत नाही. टप्प्यात आल्यावर त्यांचा कार्यक्रम करतो म्हणून करतोच. माझा अजेंडा पाणी योजना, औद्योगिकीकरण, सर्वांगीण विकासाचा आहे. त्यात कुणी आडकाठी आणली तर कार्यक्रम ठरलेला आहे हे ध्यानात ठेवा, असा इशाराही आ. गोरे यांनी दिला.