पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एका बाजूला शहरात मागील वर्षभरात सर्वाधिक बांधकामांना परवाने देण्यात आले आहेत. तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी कमी असल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट असल्याने बांधकामासाठी मलशुध्दीकरण प्रकल्पाचे (एसटीपी) पाणी वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले होते.
मात्र या आवाहनाला बांधकाम व्यवसायिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रक्रीया केलेले पाणी बांधकामासाठी वापरले नाही तर बांधकामे थांबवावी लागतील, असा थेट इशारा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बांधकाम व्यावसायिकांंना दिला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत तीन टीएमसी कमी पाणी आहे. हे पाणी शहराला दोन महिने पुरेल एवढे आहे. त्यातच, गेल्या काही वर्षात शहरात जून ऐवजी जुलैपासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठयाने तळ गाठल्यास शहरावर पाणी संक़ट ओढावण्याची भिती आहे. तर दुसरीकडे शहरात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने पालिकेचे नियोजन कोलमडले आहे. ३४ गावांना तसेच शहरातही अनेक भागात टॅंकरद्वारे पाणी दिले जात आहे.
तर, दुसऱ्या बाजूला धरणांत पाणीसाठा कमी असल्याने पाटबंधारे विभागाकडूनही पाण्याची बचत करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी, पालिकेने शहरात मोठया प्रमाणात गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी दुसरऱ्या बाजूला बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे समोर आले आहे.
पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी एसटीपीचे पाण्याला बांधकाम व्यवसायिकांनी नापसंती दर्शविली असून केवळ ८० टॅंकरचीच मागणी होत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे बांधकामांसाठी पाणी पुरवठा नेमका होतो तरी कोठून हे शोधून काढण्यासाठी महापालिकेकडून शहरात तपासणी केली जाणार आहे. कायद्याच्या तरतूदीनुसार आवाहन करुन देखील पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरल्यास दंडात्मक कारवाईसह बांधकामेही बंद ठेवण्याची कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
वर्षभरापूर्वी केली सक्ती…
महापालिकेकडून मागील वर्षी मार्च महिन्यात बांधकाम व्यावसायिकांना बांधकामासाठी एसटीपीचे पाणी वापरण्याची सक्ती केली होती. मागील वर्षी एप्रिल तसेच मे महिन्यांत त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे दरदिवशी सुमारे ८० ते ८५ टॅंकरपर्यंत पाण्याची मागणी गेली होती. मात्र, त्यानंतर पावसाळा सुरू होताच ही मागणी कमी झा. आता, महिन्याला ८० टॅंकर पाणी जात आहे.
दरम्यानच्या काळात बांधकाम व्यावसायिकांनी एसटीपीचे पाणी बांधकामांसाठी योग्य नसल्याची तक्रार केली होती. त्यावर तोडगा म्हणून पालिकेने प्रयोगशाळेतून हे पाणी तपासण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही तपासणी कोणत्या विभागाने करायची या वादात काहीच झालेले नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.