नवी दिल्ली, दि.3 -राज्यसभेच्या 18 सदस्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर त्या रिक्त जागांसाठीची निवडणूक घेण्याची वेळ आली आहे. ती निवडणूक आणखी लांबणीवर टाकण्यासाठी निवडणूक आयोगाला घटनात्मक अधिकाराचा वापर करावा लागला.
देशातील 17 राज्यांमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार होती. त्यातील 37 जागांवरील उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली. त्यामुळे उर्वरित 18 जागांसाठी निवडणूक घ्यावी लागणार होती. मात्र, करोना संकटामुळे निवडणूक आयागाने ती निवडणूक लांबणीवर टाकली. स्थितीचा आढावा घेऊन नवे वेळापत्रक जाहीर करण्याचे सूतोवाच त्यावेळी आयोगाने केले. मात्र, सध्याची स्थिती पाहता राज्यसभा निवडणूक इतक्यात घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 18 सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच निवडणूक होणार आहे.
अर्थात, ती निवडणूक केव्हा होईल ते तूर्त सांगता येऊ शकणार नाही. राज्यसभेच्या 17 सदस्यांचा कार्यकाळ 9 एप्रिलला तर उर्वरित सदस्याचा कार्यकाळ 12 एप्रिलला समाप्त होणार आहे. बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेण्याचा विधीही करोना संकटामुळे लांबणीवर पडला आहे.