मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात प्रत्येक गरजू आणि गरिबाला तीन महिन्यांचे धान्य एकत्रित आणि मोफत मिळावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात स्पष्ट आदेश दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या आदेशातील त्रुटी त्वरित दूर करून प्रत्येक गरजूला धान्य मिळेल हे निश्चित करावे, अशी विनंतीही फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे राज्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघांचे प्रभारी यांच्याशी संवादसेतूच्या माध्यमातून संवाद साधत राज्यातील पक्षाच्या सेवाकार्याचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या संवादसेतूमध्ये प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे तसेच इतरही नेते सहभागी झाले होते.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतून रेशनधान्यासंदर्भात तक्रारी येत आहेत, हे अनेकांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या आदेशाची प्रत ट्विट करून हा खुलासा केला. आगामी तीन महिन्यांसाठी हे धान्य केंद्र सरकारने अतिरिक्त उपलब्ध करून दिले आहे. ते एकत्रित आणि मोफत द्यायचे आहे. याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे, असेही त्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.
यासंदर्भात आपण केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सुद्धा चर्चा केली असून, या तीन महिन्यांसाठी जे काही धान्य लागेल, त्यातील जवळजवळ 90 टक्के कोटा हा देण्यात आला आहे. उर्वरित साठा येत्या काही दिवसात देण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.