जयपूर – गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजस्थानात बहुमताने भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले. भाजपला ११५ जागांवर तर कॉंग्रेसला ६९ जागांवर विजय मिळाला. भजनलाल शर्मा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि निवडणुकांनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा जो सपाटा सुरू आहे तो अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे आता प्रशासनाच्या वर्तुळात नाराजी व्यक्त केली जाते आहे. अधिकाऱ्यांची नाराजी एवढी वाढली आहे की बदल्यांचे हे प्रकरण आता थेट पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचले आहे.
सातत्याने बदल्या केल्या जात आहेतच मात्र एका पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनाही पुन्हा पुन्हा बदलले जाते आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ पदावरील अधिकारी पंधरा दिवसांत तीनदा बदलले गेले आहेत. काही अधिकाऱ्यांना दोन किंवा तीन महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी हलवले गेले आहे. एका अधिकाऱ्याला केवळ दहा दिवसांत एकाच पदासाठी दोनदा नियुक्त केले गेले.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शर्मा सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांच्या १३, राजस्थान प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांच्या ११ आणि भारतीय पोलीस सेवेच्या अधिकाऱ्यांच्या ७ याद्या आतापर्यंत बदल्या आणि नियुक्तीसाठी जारी केल्या आहेत. नव्याने निवडून आलेले आमदारच अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींच्या शिफारसी करत असल्याचे आरोप सुरू आहेत. बांसवाडा येथे एका पोलीस अधिक्षकाची १३ दिवसांत तीन वेळा बदली करण्यात आली.
बैरवा येथील प्रशासकीय कर्मचारीही १० दिवसांत दोन वेळा बदलले गेले. अगोदर आयएएस अधिकारी राजेंद्र सिंह राठोड यांना विशेष सहायक प्रभार दिला गेला. नंतर ९ दिवसांमध्येच भगतसिंग राठोड यांच्याकडे हा पदभार सोपवला गेला. या बदल्या सत्रांमुळे कंटाळल्यामुळे अखेर अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे धाव घेतली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आता पंतप्रधान कार्यालयाला ही माहिती द्यावी लागणार आहे म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाने अर्थात भजनलाल शर्मा यांच्या कार्यालयाने गेल्या तीन महिन्यांत कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्याची यादी मागवली आहे.
हे आहे कारण
मुळात अधिकाऱ्यांच्या इतक्या सातत्याने बदल्या का केल्या जातात याबाबत एका संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत राज्याच्या माजी मुख्य सचिवांनी सांगितले की आपल्याला हवी ती कामे करून घ्यायची असतील तर आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपल्या आवडीचा अधिकारी आणला जावा याकरता या बदल्या केल्या जातात. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच एकाच प्रकारच्या विचारांनी काम करू लागते.
आपल्याकडे ही राजकीय प्रथा झाली आहे. सरकार कोणाचेही आले तरी असेच होते. मात्र राजस्थानातील आताचे सरकार जिल्हा स्तरावरही गोष्टी नियंत्रित करण्याचा जो प्रयत्न करते आहे त्यामुळे केवळ लोकशाही व्यवस्था दुबळी केली जाण्याचेच काम होणार आहे.
यासंदर्भात बोलताना राजस्थान केडरचे एक अधिकारी म्हणाले राज्यात आता हा थट्टेचा विषय झाला आहे. एकाच अधिकाऱ्याची पुन्हा पुन्हा बदली केली जाते आहे किंवा एकाच पदावर महिनाभरात तीन तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते आहे. या सगळ्यांत कामकाज प्रचंड प्रभावित होते आहे.