भुईंज -“किसन वीर’च्या शेतकरी, कामगारांची देणी देण्याची, कारखाना सुरळीपणे चालवण्याची आणि तो शेतकऱ्यांच्याच मालकीचा ठेवण्याची जबाबदारी माझी असून हा माझा शब्द आहे. मी जेव्हा शब्द देतो तो पाळतो, असे आमदार महेश शिंदे यांनी ठामपणे सांगितले. मदन भोसले यांच्यासमोर अडचणी उभ्या करुन किसन वीर हडपण्याचे आखलेले षडयंत्र उधळून लावा, असे आवाहन त्यांनी पाचवड व केंजळ येथील सभेत केले. जरंडेश्वरवरील शेतकऱ्यांची मालकी मिटवणाऱ्यांनी, प्रतापगडबाबत तोच प्रयत्न करणाऱ्यांनी, हिंदुस्थान शुगर कारखान्यासाठी पैसे गोळा करुन हडपणाऱ्यांनी “किसन वीर’वरील शेतकऱ्यांची मालकी हटवण्याचे षडयंत्र रचले असून ते उधळून लावा, असे आवाहन मदन भोसले यांनी केले.
शेतकरी विकास पॅनेलच्या सभेत आमदार शिंदे म्हणाले, “किसन वीर कारखाना एकटा होता तेव्हा शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर मिळाल्याचा इतिहास विसरता येणार नाही. त्याचसोबत प्रतापगड कारखान्याची शेतकऱ्यांची मालकी राखताना शेतकऱ्यांच्या मालकीचा नवा खंडाळा कारखाना उभारला. या सर्व प्रगतीचा धसका घेऊनच “किसन वीर’ला अडचणीत आणण्यासाठी कुटील कारस्थानं रचली गेली. कालवा, कांगावा करायला सुरुवात झाली. जरंडेश्वर कारखान्याचा चटका आम्ही सोसला आहे. त्यामुळे तुम्हाला सांगायला आलोय सावध राहा, नाही तर तुम्हालाही चटका बसेल.” यावेळी मदन भोसले म्हणाले, “खासगी कारखाने चालावेत यासाठी “किसन वीर’ बंद पाडण्याचा डाव आखणाऱ्यांनी त्यासाठीच खंडाळा कारखाना बंद ठेवला. यांनी जरंडेश्वरवरील शेतकऱ्यांची मालकी घालवली,
प्रतापगडबाबत तोच डाव होता, खंडाळा कारखाना सुरु करण्याची तयारी दाखवली नाही आणि आता किसन वीर कारखाना चालवू म्हणताहेत. विरोधकांना शेतकऱ्यांचा कसलाही कळवळा नसून “किसन वीर’वर घाला घालण्यास आलेले मारेकरी आहेत.
‘ खंडाळा उभा राहू नये म्हणून अडचणी आणणाऱ्यांनी गोळा केलेल्या हिंदुस्थान शुगरच्या शेअर्सच्या पैशाचे काय केले, ते पैसे परत कधी करणार, हिंम्मत असेल तर आमदारांनी कधीही एका व्यासपिठावर येऊन चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले. सभासदांना देणे असलेल्या 54 कोटी रूपयांमधील एक रूपयाही देणे ठेवणार नाही, असे माझे वचन आहे, असे भोसले यांनी सांगितले. यावेळी उमेदवार सीए. सी. व्ही. काळे, प्रवीण जगताप, प्रताप यादव, पै. जयवंत पवार, विराज शिंदे, सुभाष खुडे, संतोष येवले, चंद्रकांत शेलार, पै. मधुकर शिंदे, पै. माणिक पवार, पाचवडच्या सरपंच सौ. अर्चना विसापुरे, मानसिंगराव शिंगटे, किकलीचे सरपंच धनंजय बाबर, भैय्यासाहेब जाधवराव, अतुलभैय्या कदम, प्रवीण पवार, प्रशांत शिंगटे, डॅडी वाघ, हणमंत गायकवाड, सुनील शिवथरे, जालिंदर गायकवाड, नारायण इथापे, सयाजी निकम, राजेंद्र इथापे उपस्थित होते.