विशाल भालेराव
खडकवासला -आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पावसाळा संपल्यानंतरच सप्टेंबर अथवा ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यात ओबीसी आरक्षणाचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे सर्वत्र इच्छुक निवडणुका कधी जाहीर होणार तसेच ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, त्यातच निवडणुका पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये जाहीर होणार अशी चर्चा राज्यभर सुरू झाली आहे, त्यामुळे डोणजे – मांगडेवाडी जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. हवेली तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावनेत्यांनी आपली जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. भाजपने यासाठी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे.
तसेच महाविकास आघाडीतर्फेही कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू झाल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी डोणजे – मांगडेवाडी गटात हॅटट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. तर मागील दोन टर्म जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावला होता. भाजपचे आमदार भीमराव तापकीर हे स्वतः निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीकडे जाणकरासंह युवकांचे लक्ष लागले आहे. सर्व पक्षांमध्ये इच्छुक युवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इच्छुकांच्या गराड्यात गावनेते, सर्वपक्षीयांची मात्र दमछाक होणार आहे.
जिल्हा परिषद ताब्यात आल्यानंतर विधानसभा निवडणुका लढण्यास सहज सोपे होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून मोठी ताकत लावली जात आहे. लवकरच जिल्हा परिषद निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्याआधीच सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे गटांचे रचना बदलण्याची शक्यता आहे. तसेच काही गटातील आरक्षण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक समाजाचे नेते मंडळी पुढारी देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वपक्षीयांची करडी नजर आहे.
भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात
जिल्ह्यासह हवेली तालुक्यात जातीनिहाय संख्या मोठी आहे. शिवाय महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून मोठे पाऊल उचलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने मतदारसंघातील गटामध्ये छुपी यंत्रणा राबवण्यास सुरूवात केली आहे. तसेच गटातील मातब्बर लोकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.
गावनेत्यांची मात्र शांततेत क्रांती
हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांसह लोकप्रतिनिधी, गावनेत्यांनी शांततेत क्रांती करीत विविध कार्यक्रम, यात्रा, जत्रांमधून आगामी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकासाठी लांबणीवर पडल्या असल्यास तरी ओबीसी आरक्षण, तसेच आपल्या गण, गटात कोणती गावे समाविष्ठ होणार याकडे सर्वपक्षीय गावनेत्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये आरक्षित जागा कोण कोणत्या गण, गटामध्ये असणार आहे. त्या आरक्षणानुसार अनेकांनी निवडणुकीसाठी तयारी देखील केली आहे. गण, गटाची पुनर्रचना होत असताना तेथील संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन निवडणुकीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी देखील करायला सुरूवात केली आहे.