दौंड – महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये महिला व मुलींवर अत्याचार झाले. कोविड सेंटरमध्ये महिलांचे बलात्कार व विनयभंगाचे प्रकार घडले. मात्र, तत्कालीन सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, सध्याच्या फडणवीस शिंदे सरकारच्या कार्यकाळात महिला व मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय करणार नाही. केवळ राजकीय द्वेषाने देशात व राज्यात भाजपाला बदनाम करण्याचे कट कारस्थान केले जात आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने दौंड तालुक्यातील चौफुला येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ बोलत होत्या. यावेळी माजी आमदार रंजना कुल, आमदार राहुल कुल, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल, नामदेव बारवकर, माऊली ताकवणे, हरिश्चंद्र ठोंबरे, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वाघ म्हणाल्या की, शिंदे- फडवणीस सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अत्याचार होत असताना कामामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या डझनभर पोलिसांचे निलंबन केले आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी देशभरात सातत्याने बॉम्बस्फोटाच्या घटना घडत होत्या. मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर बॉम्बस्फोटाच्या घटना घडत नाहीत.
देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या व महिलांच्या हिताचे काम करीत आहे.
आमदार राहुल कुल म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांना सातत्याने संधी दिली जाते. महिलांनी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. विकासाची गंगा सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी भाजपाच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल म्हणाल्या की, भीमा- पाटस साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. महिलांना महिलांचे सहकार्य लाभल्यास निश्चित क्रांती घडेल असा विश्वास कांचन कुल यांनी व्यक्त केला.