बीड – मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान बीडमध्ये (Beed) झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. बीडमध्ये जिथे हल्ले झाले त्या भागाची पाहणी करुन ते मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. रविवारी त्यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, बीडमध्ये झालेल्या हल्ल्यांचा विचार केल्यास काही ठाराविक लोकांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. हे सगळे नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून झाले आहे. राज्याच्या इतिहासात कधीच अशा पद्धतीच्या घटना घडल्या नाहीत. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भातील निमित्त होते. प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या ऑडिओ क्लिपमधील अर्थाचा अनर्थ करुन बीड जिल्हा पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आरक्षणाची अनेक आंदोलने देशाने बघितली आहे. परंतु असे एखाद्याला नेस्तनाभूत करण्याचे काम झाले नव्हते. बीड जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यापासून, व्यवसायाची ठिकाणे जाळण्यापासून जे काही प्रकार घडले त्याचा मी जाहीर निषेध करतो.
मराठा समाजात वितुष्टाचे काम
“या घटनांमागे फारमोठं षड्यंत्र दिसून येत आहे. मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचे काम केले जात आहे. पोलिस माजलगावला रवाना झाले होते, त्यामुळे बीडमध्ये हल्ला झाला. बीडमध्ये ठराविक ठिकाणावरच एकेक व्यक्ती, त्यांचं घर, त्यांचा व्यवसाय बघून हल्ले केले गेले. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेणार आहे, असेही मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले.