उंब्रज – कॉंग्रेसचा जन्म इंग्रजांना मदत करण्यासाठी झाला होता. तसेच कॉंग्रेस पक्षाची निर्मिती करणारे इंग्रजच होते. सर्वप्रथम संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी सरसंघचालक हेडगेवार यांनी केली होती. कॉंग्रेसची सत्ता गेल्यामुळे ते हताश होऊन पंतप्रधान मोदींना शिव्या देत आहेत. मूळ संविधानात नसलेले कलम 370 लावण्याचे काम कॉंग्रेसने केले. त्यामुळे मोदी सरकारला अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केले.
उंब्रज (ता. कराड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात दुर्बल घटक संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रमबाबा पावसकर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत पाटील, रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर भाजप अध्यक्ष महेशकुमार जाधव, आरपीआय कराड तालुकाध्यक्ष उत्तमराव कांबळे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
मिश्रा म्हणाले, “”छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने देशात अनेक स्वातंत्र्यवीर निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा व्यापक प्रभाव देशाच्या संस्कृती आणि इतिहासावर आहे. 200 वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी सामाजिक विषयावर उठाव करून त्यावर समाधानकारक काम केले.
स्वातंत्र्यानंतरची भारताची संकल्पना डॉ. आंबेडकर यांनी मांडली होती. परंतु, स्वातंत्र्यानंतरचे सरकार आंबेडकर यांच्या विचाराचे नव्हते. आंबेडकर यांना निवडणुकीत हरवण्याचे काम त्यावेळचे सरकार व पंतप्रधानांनी केले. त्यांना सन्मान मिळून न देण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. दुर्बल व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबवून त्यांना सक्षम बनवण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. देशाला ताकदवान बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मोदींनी एकसंघ भारत बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “”भाजपा एकट्या कुटुंबावर चालणारा पक्ष नाही; तर तो विचारांवर चालणारा पक्ष आहे. देशाबाबतीत कोणतीही तडजोड न करणारा पक्ष आहे. जिल्ह्यावर भाजपचा झेंडा लावला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार कोण, हे नंतर ठरवले जाईल. जिल्ह्यात कोणाची किती ताकद आहे, हे वरिष्ठांना माहित आहे. केंद्रात ज्या योजना राबवल्या जातात, त्याचा पैसा थेट लाभधारकांच्या खात्यावर जमा होतो. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्याचा कोणतेही प्रश्न सोडवला नाही. तर मूलभूत प्रश्न प्रलंबित ठेवले. ते प्रश्न भाजपच्या माध्यमातून सोडवायचे आहेत.” डॉ. अतुल भोसले म्हणाले, “”मोदींच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे. विविध योजना पूर्ण करण्याचे काम मोदींनी केले. सर्वांनी मिळून पक्षाला बळकट केले पाहिजे.” यावेळी रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, उत्तम कांबळे याची भाषणे झाली.