विजय घोरपडे
नागठाणे – एस. टी महामंडळाच्या शिवशाही बसने प्रवास करणे म्हणजे … नकोच, खरोखर असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आल्याचे दिसुन येत आहे. वारंवार होणारे अपघात हे या बससेवेचं दुखणंच होऊन बसले असून राज्यात शिवशाहीच्या अपघातांची संख्याही मोठी आहे. महामार्गावरील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 22 कि. मी. चा हायवे जातो. या हायवेवर गत एक महिन्याच्या कालावधीत शिवशाही बसेसचे तब्बल 7 अपघात झाले आहेत. पैकी 5 अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात झाली. तर 2 अपघातांची नोंदच नाही. शिवशाही बसच्या अपघातांची आकडेवारी प्रवाशांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच एस टी. ने टप्पा वाहतुकीच्या स्वरूपात राज्यातील प्रवाशांच्या सेवेचा वसा घेतला. वर्षानुवर्षे चांगली सेवा देणाऱ्या एस. टी. ने वेळोवेळी बदल स्वीकारत मार्गक्रमण केले. त्याच बदलांपैकी एक सेवा म्हणजेच शिवशाही बस. एस.टी महामंडळाच्या मालकीच्या काही बसेस तर उर्वरीत बसेस खाजगी कंत्राटदारांकडून प्रती किलोमीटर भाड्याने महामंडळाने भाडेतत्वावर घेतल्या. महामंडळाच्या बसेसला मंडळाचेच प्रशिक्षीत चालक व वाहक सेवेत आहेत तर खाजगी शिवशाही बसेस ला कंत्राटदारांकडून फक्त चालक पुरवले जातात.
अशा बसेसला वाहक महामंडळाचेच आहेत. पण खरा घोळ इथेच होताय, अप्रशिक्षीत खाजगी चालक असल्याने अपवाद वगळता जादा अपघात याच गाडयांचे होताना दिसताहेत. अशा बसेसवर काहीवेळा तर ग्रामीण भागातील वडाप आर. टी. ओ.बॅच बिल्लाधारक चालकही दिसून आलेले आहेत व तशी प्रवाशांमध्ये चर्चाही आहेच. पण शिवशाही बसेसची बांधणीही अपघातांस काही अंशी कारणीभुत असल्याची चर्चा खुद्द चालकांमध्येही आहे. प्रवाशांना आरामात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी सुरुवातीला शिवशाही बसेसचा उपयोग झाला.
साधी लालपरी व शिवशाहीच्या तिकीट दरात तफावत असूनही प्रवाशांनी ही सेवा स्विकारली पण कालांतराने या सेवेबाबत तक्रारी वाढत गेल्या. त्यात भाडेत्वावरील गाडीचे चालक प्रामुख्याने गाडी पूर्णपणे भरल्यानंतर मार्गस्थ होताच गाडीतील ए. सी. यंत्रणा बंद करणे, प्रवाशांच्या लक्षात येण्याइतपत असुरक्षित ड्रायव्हींग करणे अशा बाबी सोबतच अलीकडील काळात वाढते अपघात पाहता, शिवशाहीने प्रवास? नको रे बाबा म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
मध्यंतरीच्या एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपानंतर कात टाकणाऱ्या एस. टी. च्या ताफ्यात आता नवीन अत्याधुनिक व आकर्षक लालपरी बस दाखल होत आहेत. त्यामुळे एस. टी. कडे प्रवाशी पुन्हा आकर्षित होतोय. त्यासाठी एस. टी प्रशासनाने राज्यात शिवशाहीच्या अपघातांची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करणं प्रवाशांच्या दृष्टीने गरजेचं असल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे.