नवी दिल्ली : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. देशभरात पक्षाचे कार्यकर्ते सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. दुसरीकडे, राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आज काँग्रेसने दिल्लीतील राजघाटावर तसेच सर्व जिल्हा मुख्यालयांवर एक दिवसाचा सत्याग्रह करत आहे. यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील या सत्याग्रहात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत माझ्या शहीद वडिलांचा संसदेत अपमान झाला, पण ज्यांनी अपमान केला त्यांना संसदेतून बाहेर कोणी काढत नाही.. का? असा उद्विग्न सवाल यावेळी त्यांनी केला. तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना प्रियंका म्हणाल्या की, तुमचे मंत्री संसदेत माझ्या आईचा अपमान करतात. ‘आप’च्या एका मंत्र्याने ‘राहुल गांधींना त्यांचे वडील कोण हे माहित नाही.असे म्हणत आपल्या आईचा अपमान केला. एवढेच नाही तर मुलगा वडिलांचा मृत्यू झाल्यावर कौटुंबिक पगडी घालतो आणि परंपरा चालवतो, तुम्ही त्याचा अपमान करता, पण तुमच्यावर कारवाई किंवा शिक्षा होत नाही. तुम्हाला संसदेतून कोणी बाहेर काढत नाही.असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला.
पुढे बोलताना त्यांनी संसदेत माझ्या भावाने मोदीजींना मिठी मारली आणि मी तुमचा द्वेष करत नाही, असे सांगितले. आमची विचारधारा वेगळी आहे पण आमची द्वेषाची विचारधारा नाही. ही या देशाची परंपरा आहे का? प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजप घाबरले आहे कारण राहुलने प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत… एखाद्या माणसाला गप्प करण्यासाठी इतके केले जाते हे हास्यास्पद आहे. या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत म्हणत प्रियांकानी मोदींवर जोरदार निशाणा साधला.