लखनौ – देशातील सगळ्यांत मोठे राज्य उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची कोंडी करण्यासाठी राज्यात 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची घोषणा कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केली होती. पण त्या राज्यात उमेदवारी मिळवण्यासाठी महिलांमध्ये असलेला निरूत्साह पाहता ही घोषणा कॉंग्रेसवरच बूमरॅंग होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लवकरच या राज्यात निवडणुकीचे वेळापत्रक जारी केले जाणार असून राजकीय पक्षांनी अगोदरच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कॉंग्रेसनेही ही निवडणूक मनावर घेतली असून त्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. स्वत: कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी या उत्तर प्रदेश निवडणुकीत विशेष लक्ष घालत आहे.
विशेष म्हणजे त्यांनी सर्व लक्ष महिला मतदारांकडे केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच निवडणूक जाहीरनामा जाहीर करताना प्रियंका गांधी यांनी महिलांना 40 टक्के तिकीट देण्याची घोषणा केली होती. प्रियंका गांधी यांनी ही घोषणा केल्यानंतर इतर पक्ष बॅकफूटवर गेले होते.
सूत्रांच्या मते, महिलांना तिकीट देण्याचा मुद्दा कॉंग्रेससाठी अडचणीचा ठरत आहे. कारण काही दिवसांपूर्वी 7 जिल्ह्यांतील अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात पुरुषांचीच संख्या सर्वाधिक होती. संपूर्ण उत्तर प्रदेशातून 1700हून अधिक अर्ज आले आहेत. त्यात महिलांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कॉंग्रेसला आता महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. नाही तर विरोधकांकडून हाच निवडणुकीचा मुद्दा केला जाऊ शकतो.
अर्ज स्वीकारण्याची तारीख उलटून गेल्यानंतर लखनौच्या जागेसाठी 110 अर्ज आले होते. त्यात केवळ 18 अर्ज महिलांचे होते. तर लखनौ सेंट्रलसाठी 15 जणांनी अर्ज केले. त्यात सात महिलांचे अर्ज होते. मोहनलालगंजमध्ये सात पैकी तीन महिला, पूर्वमध्ये 11 पैकी 3 महिला, कॅंटसाठी 9 पैकी दोन महिला आणि उत्तरच्या जागेसाठी 9 पैकी दोन महिलांचे अर्ज आले होते.