‘कमळ’ हिरमुसले : शिवसेनेचा “बाण’ मोडला
पुणे – पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहा मतदारसंघात रंगलेल्या तुल्यबळ लढतीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, आंबेगाव, शिरूर, खेड, जुन्नर, मावळात “घड्याळ’ची जोरदार टीकटीक; भोर, पुरंदरमध्ये “पंजा’ची “चपराक’; तर दौंड मतदारसंघात “कमळ’ फुलले आहे. तर शिवसेना शहराप्रमाणे जिल्ह्यातूनही हद्दपार पार झाली असल्याने यंदा “घड्याळ’ आणि “पंजा’समोर “बाण’ पुरता कोलमडून पडला आहे.
इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभवाची चव चाखणे आणि बारामती विधानसभा मतदारसंघात डिपॉझिटही जप्त होणे हे भाजपसाठी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, तर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बाजी मारीत महायुतीची “लाज’ राखली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ते जोमात आले असून शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते “कोमात’ गेले आहेत. 2014च्या निवडणुकीत झालेलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यातील ग्रामीण भागात सपाटून कामाला लागली. त्याचबरोबर नागरिकांशी न तोडलेला संपर्क अन शरद पवार यांचे वादळ यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तरले असून त्यांनी याबळावर मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले. तर
या उलट स्थानिक अडचणींपेक्षा शिवसेना-भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुणगाण यांसह पुलवामा हल्ला बदला, कलम 370 रद्द यावरच निवडणूक खेळवत ठेवत स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी स्वत:च्या पायावर हातोडा पाडून घेतला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दहा मतदारसंघानुसार 2014 आणि 2019चा पक्षीय बलाबल
पक्ष 2014 2019
भाजप +3 1
शिवसेना + 3 0
रष्ट्रवादी 3 7
कॉंग्रेस 1 2