मुंबई – मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली. परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळ दिली नाही. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.
पंतप्रधान मोदी हे चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता भेट मागणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नरेंद्र मोदी आणि भाजपला छत्रपतींची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळीच येते का, असा संतप्त सवालही सचिन सावंत यांनी विचारला. मोदींनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न असल्याने आमचा आक्षेप नाही पण मराठा समाजाच्या समस्या घेऊन जाणाऱ्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांना व तेही छत्रपतींच्या वंशजाला भेट न देणे हे महाराष्ट्राला कदापि आवडणार नाही. असेही सावंत यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असतानाही भाजपाकडून त्यावर राजकारण केले जात आहे. राज्य सरकारवर सर्व ढकलून राज्यातील भाजपा नेते नरेंद्र मोदी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा ही आरक्षणविरोधी आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी जर भाजपाची प्रामाणिक इच्छा असती तर पाच वर्ष महाराष्ट्रात तसेच केंद्रातही सत्ता असताना फुलप्रुफ आरक्षण देता आले असते पण सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण किती फुलप्रुफ होते हे दाखवून दिले आहे, असेही सावंत म्हणाले.