मुंबई : भाजपा अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम व भोंगळवाद स्थापित करण्याचे काम भाजपा करत आहे. असा जोरदार निशाणा कॉंग्रेसकडून भाजपवर लावण्यात आला आहे. राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत जात आहे. त्यापार्श्वूभूमीवर अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. मात्र मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली नाही. भाजपकडून यास परवानगी मिळावी यासाठी जोर लावून धरण्यात आला आहे. यावरूनच ही शाब्दिक चकमक सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे.
सचिन सांवत म्हणाले की, ”राजकारण व अध्यात्म परस्परविरोधी मार्ग आहेत. भाजपा या अधर्माचा अध्यात्माशी संबंध काय? भाजपा अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम व भोंगळवाद स्थापित करण्याचे काम भाजपा करतेय. अनाचार्याच्या भाषेचा अध्यात्माशी दूरचाही संबंध नाही. धर्माच्या राजकारणासाठीचे हे थोतांड बंद करा.”
करोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. त्यासाठी धार्मिक उत्सव व यात्रांवर घालण्यात आलेले निर्बंध तूर्त कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, भाजपने त्यास आक्षेप घेतला आहे. आषाढी वारी पायी होऊ देण्याचा आग्रह भाजपने धरला आहे.
‘राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुघलांचे सरकार आहे. अनलॉकमध्ये सर्व गोष्टींना परवानगी दिली असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अनलॉकमध्ये मंदिरांचा समावेश करावा. यंदा पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही,’ असा इशारा भाजपचे तुषार भोसले यांनी दिला होता.