मुंबई – केंद्रातील भाजप सरकारचे अपयश अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसतर्फे 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत संपुर्ण राज्यात जनसंवाद यात्रा काढल्या जाणार आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवसांची बैठक 31 ऑगस्ट पासून मुंबईत होत आहे. त्यानंतर लगेचच हा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रमुख नाना पटोले म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाचे नेते या कालावधीत सरकारचे अपयश लोकांपुढे मांडण्यासाठी आणि विरोधी आघाडीचा संदेश देण्यासाठी सर्व राज्यात तालुका, गाव आणि शहर स्तरावर फिरतील.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे अनुक्रमे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात नेतृत्व करणार आहेत,
तर पश्चिम विदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नेतृत्व करणार आहेत. पटोले स्वत: पूर्व विदर्भातील जनसंवाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सर्व प्रदेश कॉंग्रेस नेते दोन दिवस कोकण किनारपट्टीचा दौरा करणार आहेत.
पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यघटनेचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. देशात लोकशाहीवर हल्ला होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून प्रतिस्पर्ध्यांमध्ये भीती निर्माण केली जाते. या प्रश्नांवर आम्ही सरकारचा पर्दाफाश करू, असे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देत असून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा आणि जनावरांच्या चारा या समस्या गंभीर बनल्या आहेत. ऑगस्ट संपत आला तरी राज्याच्या अनेक भागात पाऊस पडला नाही. पण राज्य सरकार मात्र उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. कांद्यावरुनही थोरात यांनी केंद्रावर निशाणा साधला.