पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या सुधारित प्रवेशप्रक्रियेसाठी नवीन नियमावली प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. बालकाचा चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज, दि. १७ मेपासून सुरू होत आहे. दि. ३१ मेपर्यंत शाळांना अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर लॉटरी काढून प्रवेश दिले जाणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. आर्थिक वर्षामध्ये ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, ते आरटीई प्रवेशासाठी पात्र आहेत. प्रवेशप्रक्रियेकरिता १० शाळांची निवड करावी लागणार आहे.
दरम्यान, अर्ज भरताना पालकांनी घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे आहे. तसेच, निवासस्थानाचे लोकेशन हे अचूकपणे नमूद करावे. तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावा. प्रवेशप्रक्रियेबाबत समस्या असल्यास पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू नयेत. प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, अशा विविध सूचनांचा समावेश आहे.
एसएमएसवर अवलंबून…
अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. तसेच रिक्त जागा राहिल्या असतील तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा संदेश पाठविला जाईल. यानंतरही जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा संदेश पाठविला जाईल. पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले.