नवी दिल्ली – राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. शनिवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी आणि कॉंग्रेस या दोघांवर हल्लाबोल केला. कॉंग्रेस ही देशाची समस्या असून कॉंग्रेसची समस्या राहुल गांधींचे वागणे हेच आहे, असे ते म्हणाले. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आज कॉंग्रेसवाले तोंडाला कुलूप लावून आंदोलन करत आहेत. राहुल गांधी तुम्ही तोंडाला कुलूप का लावले नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातून मोदी जातीबद्दल अपमानास्पद शब्द वापरता? ज्या प्रकारे तुम्ही एका जातीचा अपमान केलात, ओबीसींचा अपमान केला, ते कधीही समर्थनीय असणार नाही.
तुम्ही स्वतःला राजा-महाराजांपेक्षा कमी समजत नाही. न्यायव्यवस्थेचा अपमान करण्यापूर्वी हे कुलूप तुम्हीच तुमच्या तोंडाला लावायला हवे होते. दुर्दैवाने मी खासदार आहे असे सांगून तुम्ही संसदेचा अपमान केला. संसदेत काही बोलल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने डोळे मिचकावले ते संपूर्ण भारताने पाहिले होते. हीच का खासदारकीची प्रतिष्ठा? याआधीही तुम्ही वादग्रस्त विधाने करत असल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. तुम्ही पंजाबच्या तरुणांची आणि यूपीच्या तरुणांची चेष्टा केली आहे, असे चौहान म्हणाले.
चौहान शेवटी म्हणाले की, मंदिरात जाणाऱ्यांना तुम्ही छेडछाड करणारे म्हटले आहे. तुम्ही सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केलेत. लष्करावरही प्रश्न उपस्थित केलेत. तुम्ही तुमच्याच पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अपमान केला. राहुल जी, तुम्ही आणि कॉंग्रेसवाल्यांनी त्यावेळी हे कुलूप का नाही लावलेत?