नवी दिल्ली: देशात नुकत्याच पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी ही म्हणावी तेवढी चांगली राहिली आहे. निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. याच मुद्द्यावरून आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचा पराभव कशामुळे झाला याचे आत्मपरीक्षण करण्यात आले. तसेच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.
पाच राज्यांमधील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या निकृष्ट कामगिरीनंतर पक्षाचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षात सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच निवडणुकीत पराभव का झाला याची कारण मीमांसा देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व गोष्टी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एक समिती स्थापन करणार असल्याचेही म्हटले. ही समिती पक्षात काय बदल करायचे आहेत आणि पक्षाला बसलेले झटके यावर माहिती गोळा करणार आहे. समितीने तयार केलेल्या अहवालावर पक्ष प्रमुख निर्णय घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झालेल्या कॉंग्रेसच्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी आसाम आणि केरळमधील पराभव आणि पश्चिम बंगालमधील शून्य जागा अत्यंत निराशाजनक असल्याचे सांगितले.
देशातील कोरोनाच्या मुद्द्यावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोना नियंत्रित करण्यात मोदी सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला. सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या मदतीला जाण्याचे आवाहन देखील यावेळी केले.