जयपुर – देशातील वाढत्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असून या संबंधात सरकारला जाग आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे रविवारी जयपुर मध्ये राष्ट्रीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे नेते या सभेला संबोधित करणार असून कॉंग्रेसचे देशभरातील सर्व आजी माजी मुख्यमंत्रीही या सभेला उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सुर्जेवाला म्हणाले की गेल्या काहीं काळांतील मोदी सरकारचा प्रत्येक निर्णय गरीब विरोधी राहिला आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात महागाई वाढली आहे असे ते म्हणाले. मोदींच्या धोरणामुळे देशातील छोटे आणि मध्यम उद्योग साफ बुडाले आहेत.
देशातील ना नक्षलवाद संपला ना दहशतवात संपला. विदेशातून ना काळा पैसा परत आला ना देशातील काळा पैसा नाहीसा झाला. देशातील बेरोजगारीचा दर दहा टक्क्यांवर गेला असून मोदी सरकारला सत्तेवरून घालवल्याशिवाय महागाईच्या प्रश्नावर प्रभावी तोडगा काढता येणार नाहीं असे ते म्हणाले.
देशात गरीबांचे प्रमाण वाढले असून 90 टक्के जनता हालाकिच्या स्थितीत जगत आहे. देशातील दहा टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या 57 टक्के संपत्ती एकवटली आहे. समाजातील ही विषमता सध्याच्या बिकट स्थितीला कारणीभूत आहे असा आरोपही सुर्जेवाला यांनी केला आहे.