नवी दिल्ली – कॉंग्रेसने ममता बॅनर्जी यांच्याशी संगनमत करून कट रचला आणि इंडिया आघाडीचे नेतृत्व हायजॅक केेले असा दावा जेडीयुचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी केला आहे. आज अचानक नितीशकुमार यांनी घुमजाव करून इंडिया आघाडीशी असलेले संबंध तोडले आणि त्यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली. या मागची कारण मिमांसा देताना त्यागी हे प्रतिपादन केले.
त्यागी म्हणाले की, ममतांनी इंडिया आघाडीच्या एका बैठकीत मल्लिकार्जून खर्गे यांना या आघाडीचे अध्यक्ष करण्याची सूचना केली. ही कॉंग्रेसशी संगनमत करून केलेली खेळी होती. त्यामुळे आम्ही नाराज झालो. त्या खेरीज कॉंग्रेसने जागा वाटपाच्या चर्चेत घोळ घातला आणि ही चर्चा लांबवली.
ही चर्चा त्वरीत सुरू करावी अशी आमची मागणी होती. परंतु कॉंग्रेसने त्याकडे लक्ष दिले नाही. भाजपशी समर्थपणे लढण्याची मानसिकताच कॉंग्रेसकडे नाही असा आरोप देखील त्यागी यांनी यावेळी केला.
कॉंग्रेसने जागा वाटपाबाबत घटक पक्षांवर दबाव आणला. त्यांच्या अन्य नेत्यांनी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा अवमान करीत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यागी यांनी केला आहे.