सातारा – भारत जोडो यात्रेच्या यशस्वितेनंतर अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्यावतीने “हात से हात जोडो’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता जिल्हा कॉंग्रेस भवनात तर सातारा ग्रामीणचा शुभारंभ वेळे कामथी (ता. सातारा) येथे दुपारी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा यशस्वी झाल्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सुचनेनुसार राज्यात “हात से हात जोडो’अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या निर्देशावरून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार “हात से हात जोडो’ अभियानाचा विस्तारित कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
या अभियानाचा शुभारंभ शनिवारी सकाळी 11 वाजता आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रभारी श्रीरंग (नाना) चव्हाण पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पनाताई यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस भवनात होणार आहे. सातारा ग्रामीण कॉंग्रेसचा शुभारंभ वेळे कामथी येथे दुपारी 4 वाजता होणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष, महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष, डॉक्टर सेल, विधी सेल जिल्हाध्यक्ष आदी सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे.