कॉंग्रेसची लोकांयुक्तांकडे चौकशीची मागणी
मुंबई (प्रतिनिधी)– विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते याच्या भीतीने राज्य शासनाच्या विविध विभागांनी अनेक निर्णय घेतले आहेत. नेमक्या याच निर्णयावर कॉंग्रेसने आता संशयाचे भूत उभे केले आहे. 16 सप्टेंबरपासून ते 21 सप्टेंबरपर्यंत शासनाच्या सर्व विभागाने घेतलेल्या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्याच्या लोकायुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, याचा अंदाज असल्याने राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी आर्थिक लागेबांधे असलेले व स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना राजकीय व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अर्थपूर्ण निर्णय या आठवड्यात अत्यंत घाईगडबडीत घेतल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारचे संकेतस्थळ 20 सप्टेंबरपासून पूर्णपणे ठप्प झालेले आहे.
अनेक निर्णय मागच्या तारखेत घेतले आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात सुरु आहे. म्हणूनच 16 सप्टेंबरपासून आजपर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी, अशा मागणी करतानाच आचारसंहितेची अमंलबजावणी सुरू झाल्याच्या क्षणापासून कोणत्याही निर्णयाची माहिती शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यास मनाई करावी. तसेच असे निर्णय तत्काळ रद्दबादल ठरवावेत, असेही लोकायुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.