नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान कॉंग्रेस नेत्यांवर आणि यात्रेवर करण्यात आलेल्या हल्ल्यांची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांच्याकडे केली आहे.सैकिया यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे राज्य सरकार यात्रेपुढे गंभीर प्रशासकीय नाकेबंदी निर्माण करत आहे आणि शांततापूर्ण भारत जोडो न्याय यात्रेची तोडफोड करण्यासाठी बेकायदेशीर कृत्ये करीत आहे.
रविवारी यात्रेदरम्यान, एआयसीसीचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना घेऊन जाणारे वाहन सत्ताधारी भाजपच्या समर्थकांनी जबरदस्तीने रोखले आणि त्यांनी त्यांना शाब्दिक शिवीगाळ केली आणि त्यांच्या गाडीवरील स्टिकर्स फाडले, असे देखील समोर आले आहे. त्यानंतर, जमुगुरिहाट येथे, प्रदेशाध्यक्ष बोरा यांच्यावर भाजप समर्थकांनी शारीरिक हल्ला केला ज्यामुळे नाकातून रक्तस्त्राव झाला तर सुमारे २०-२५ बेशिस्त लोकांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. विविध ठिकाणी त्यांनी पत्रकारांनाही सोडले नाही, असे सैकिया म्हणाले.
नझिरा येथील काँग्रेस आमदाराने आरोप केला की, पोलीस कर्मचारी सुरक्षित अंतरावरून प्रेक्षक बनून हे हल्ले पहात राहिले. सरमा यांचे भाजप सरकार पोलीस आणि नागरी प्रशासनाचा वापर यात्रा उधळण्यासाठी करत आहे. सभेच्या मैदानावर आणि पदयात्रे दरम्यान आसाम पोलिसांच्या संरक्षणात यात्राविरोधी पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस नेते सैकिया यांनी सांगितले की त्यांनी डीजीपीकडे तक्रार केली होती परंतु त्यांनी ट्विट केले की त्यांनी यात्रेदरम्यान सर्व प्रकारच्या संरक्षणाची व्यवस्था केली आहे.हे मात्र उघड खोटे आहे कारण अशी कोणतीही व्यवस्था जमिनीवर दिसत नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने यात्रेसाठी आवश्यक परवानगीसाठी अर्ज केला होता आणि औपचारिकता पूर्ण केली होती परंतु चिंताग्रस्त राज्य सरकारने सर्व संभाव्य अडथळे निर्माण करण्यासाठी प्रशासकीय दिरंगाई केली आहे, असा आरोप सैकिया यांनी केला.