सातारा, {श्रीकांत कात्रे} – अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदश्चंद्र पवार) सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांंची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडीवर पडदा पडला असला तरी महायुतीच्या डावपेचांचे आव्हान महाआघाडीपुढे आहे.
त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेते म्हणून परिचित असणाऱया शशिकांत शिंदे यांच्यापुढे वेगळेच आव्हान आहे. कारण आता एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरते नव्हे तर सहा विधानसभा मतदारसंघात संपर्क साधून आपली राजकीय कारकीर्द व पक्षाची प्रतिमा उजळण्याची संधी त्यांना लाभली आहे.
लोकसभा निवडणुकीत दरवेळी उमेदवारी निश्चित होऊन प्रचाराची रणधुमाळी सुरु करणायात सातारा जिल्हा आघाडीवर असतो. यावेळी मात्र, उमेदवारीचा सस्पेन्स रेंगाळल्यामुळे अस्पष्ट लढतींचे चित्र सातारा व माढा या लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये दिसत आहे.
माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांनी भाजपची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यांचा प्रचारही सुरु झाला आहे. मात्र, महाविकास आघाडीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) अजूनही उमेदवार जाहीर नाही.
अकलूजच्या जयसिंह मोहिते पाटील यांचे नाव चर्चेत आघाडीवर असले तरी अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. तर सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदश्चंद्र पवार) शशिकांत शिंदे यांची उमेदवारी आज जाहीर केली. मात्र, विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचे उमेदवार म्हणून प्रचार सुरु केला असला तरी भाजपने किंवा महायुतीने सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबातचा निर्णय अद्यापही जाहीर केलेला नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात प्रचाराने अजूनही अपेक्षित अशी गती घेतली नाही.
सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यासह आणखी काही नावे चर्चेत होती. परंतु, अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
शशिकांत शिंदे यांची कारकीर्द माथाडी कामगारांचे नेते म्हमून सुरु झाली. तेव्हापासूनचा त्यांच्या संघर्षाचा प्रवास जिल्ह्याने पाहिला आहे. ज्येष्ठ नते शरद पवार यांचे समर्थक असणारे शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम करीतआहेत.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसनेकडे गेलेला जावळी मतदारसंघ शशिकांत शिंदेने खेचून आणला. तेव्हापासून २००९ पर्यांत जावळीचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी धडाडी दाखवल्यामुळे त्यांना मंत्रिपदांपर्यंत मजल मारता आली. विदनसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यावर जावळी मतदारसंघाचे अस्तित्त्व संपुष्टात आले आणि तो मतदारंसघ सातारा मतदारसंघात समाविष्ट झाला.
घरचा मतदारसंघ गेल्यावर शशिकांत शिंदे कोरेगावातून शालिनीताई पाटील यांच्याविरुद्ध लढून निवडून आले. २०१९ पर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याविरुद्ध लढताना ते पराभूत झाले. मात्र, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेत संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमदील फुटीनंतर ते शरद पवार यांच्यासमवेत राहिले.
या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांना मिळालेली उमेदवारी आता त्यांना एक प्रकारे आव्हानच ठरणार आहे. विधानसभेचा त्यांचा पूर्वीचा जावळी मतदारसंघ गेलेलाच आहे. त्यांच्या हातातील कोरेगाव मतदारसंघ परत मिळविण्यासाठी ते संघर्ष करीत आहेत. आता विधानसभेऐवजी लोकसभा मतदारसंघातून काम करण्यासाठीचा मोठा विचार त्यांना करावा लागणार आहे.
म्हणजेच त्यांची कक्षा आता रुंदावणार आहे. एकऐवजी सहा विधानसभा मतदारसंघांच्या समस्या, त्यावरच्या उपाययोजना याबाबतच्या अभ्यासासाठी त्यांना आता प्रयत्न करावे लागणार आहेत. एका अर्थाने यापुढे राज्याच्या नव्हे तर केंद्रीय पातळीवरच्या राजकारणात जाण्याची संधी या निवडणुकीने त्यांना मिळाली आहे.
अनेक पातळ्यांवर लढण्याची गरज
विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचे आव्हान असण्याची शक्यता सध्या असली तरी महायुतीने अधिकृत उमेदवारीची घोषणा केल्यानंतर या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यावर शशिकांत शिंदे यांचे राजकीय डावपेच कसे चालणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षात पडलेली फूट, उर्वरित नेत्याकार्यकर्त्यांची सांगड घालून निवडणुकीचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे, एवढे निश्चितच आहे.
त्याशिवाय महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या इतर घटक पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांची मोटही बांधण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरु होताच शशिकांत शिंदे यांना अनेक पातळ्यांवर लढण्यासाठी सतर्कता दाखवावी लागणार आहे.