नवी दिल्ली – देशात 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रणनीती निश्चित करण्यासाठी कॉंग्रेसने एक सक्षम कृतिगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संबंधात विचार करण्यासाठी 13 ते 15 मे दरम्यान राजस्थानच्या उदयपूरमध्ये ‘चिंतन शिविर’ आयोजित करण्याचा निर्णयही आज झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला आहे.
आजच्या बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याच्या संबंधात निर्णय घेतला जाणे अपेक्षित होते. पण या विषयीचा कोणताही निर्णय आज झालेला नाही.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षात प्रवेश करण्याबाबत काही निर्णय झाला आहे का, असे पत्रकारांनी कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांना विचारले असता त्यांनी यावर थेट उत्तर देण्याचे टाळले. ते म्हणाले की, जो एम्पॉवर्ड ऍक्शन ग्रुप स्थापन केले जाणार आहे त्यात सर्वांचा सहभाग असेल. सुरजेवाला म्हणाले की, 21 एप्रिल रोजी त्यांनी स्थापन केलेल्या आठ सदस्यीय गटांकडून पक्षाध्यक्षांना अहवाल प्राप्त झाला आहे.
त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुर्जेवाला यांनी 13, 14 आणि 15 मे रोजी उदयपूर येथे ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ ‘नवसंकल्प चिंतन शिविर’ आयोजित करण्याचा कॉंग्रेस अध्यक्षांच्या निर्णयाची घोषणा केली.
विविध राज्यांतील चारशे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते यात सहभाग होतील असे सुर्जेवाला यांनी सांगितले. ते म्हणाले की, चिंतन शिबिरामधील चर्चेचा केंद्रबिंदू सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती आणि आपल्या समाजासमोरील आव्हाने यावर असेल.